Nirvicharita

Mumbai (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Nirvicharita “VIC Date 6th April 1976 : Place Mumbai Seminar & Meeting Type Speech Language Marathi

हे सहजयोगाचे कार्य किती विशेष आहे! मी आपल्याला आधी सांगितलं की गणपतीसारखं एक नवीन मॉडेल मी तयार केलं आहे तुमचं. एक नवीन पद्धत आहे ही. ती विशेष रूपाने तुम्ही ग्रहण केली कारण तुम्ही त्या ग्रहणाला योग्य आहात. अयोग्य दान नाही दिलेलं मी. तुमची योग्यता क्षणोक्षणी, पदोपदी मी जाणते. फक्त एवढे म्हणता येईल की आईच्या प्रेमामुळे फारच हळुवारपणे, सांभाळून, प्रेमाने, अत्यंत काळजीपूर्वक हे कार्य झालेले आहे. पण आपल्यामध्ये ती योग्यता नसती, तर हे झालं नसतं. पैकी आज हजारो मंडळी इकडे-तिकडे धावत आहेत. वेड लागलं आहे लोकांना. विचार करीत नाही, की आजपर्यंत शास्त्रांमध्ये जे सांगितलेले आहे, अनादी कालापासून, जे मोठ्या-मोठ्या त्त्ववेत्त्ांनी आणि कृष्णासारख्या महान परमेश्वराने, ते त्याचीच एक साक्ष आहे. त्यांच्या तोंडूनही ज्या गोष्टी निघाल्या, त्या सगळ्यांना एकीकडे फेकून ह्या लोकांनी ज्या नवीन नवीन पद्धतींनी लोकांना आपल्या जाळ्यात फसवलेले आहे त्याबद्दल कोणताही विचार हे लोक का करीत नाहीत ? कोणत्याही शास्त्रात, मग ते मोहम्मद साहेबांनी लिहिलेले असो, किंवा ख्रिस्तांनी सांगितलेले असो, किंवा कृष्णाने गीता म्हटलेली असो, सगळ्यामध्ये जे तत्त्व आहे, की तुम्हाला स्वत:च्या आतमध्ये असलेला स्व जाणला पाहिजे आणि त्याची शक्ती तुम्हाला लाभते. पण असे म्हटल्याबरोबर लोक त्यापासून परावृत्त होतात. कारण सत्याच्या गोष्टी केल्या की लोकांना ते पटतच नाही मुळी. असत्य असलं की ते लगेच पटतं आणि असत्याच्या मार्गावर चालण्याची सवय पडल्यामुळे ते रुचतंही जास्त. असत्याची कास धरून मानवाने शेवटी गाठलंय काय? तर नरकाची पायरी. नरक गतीला उतरायची स्थिती आलेली आहे. हे कलियुगात दिसतंय आपल्याला चहुकडे. बापाला मुलाचा विश्वास नाही, मुलाला आईचा विश्वास नाही. संसारात सगळा हाहाकार माजलेला आहे. अशा परिस्थितीत सत्य पुढे केल्याबरोबर लोक असे बिचकतात, जसे अंधारातून कोणाला एकदम सूर्यात आणलं, की त्यांचे डोळे दिपतात आणि नको तो प्रकाश म्हणून मागे सरतात. तेव्हा सहजयोगात येणार नाहीत. हे लिहून पुष्कळ मंडळी एकदम ठेवणे. आली ती घसरणार. कोलमडणार आणि परत त्यांना मी जागेवर बसवणार आणि तरीसुद्धा परत परत धावणार. ही स्थिती राहणारच आहे मुळी, ती काही काळ. पण सहजयोगाला स्थायित्व, जगजाहीर ज्याला म्हणतात तसं करायचं असलं तर त्याचा एकमात्र इलाज आहे, आम्ही काहीही असलो तरी ते आहोतच. आमचं काही वैशिष्ट्य नाहीये ते किंवा आम्ही काही मिळवलेलंही नाही. आम्ही आहोत तसेच आहोत, जन्मजन्मांतरापासून. तेव्हा आमचं त्याच्यात काही देणं नाही न घेणं नाही. तेव्हां आम्ही असलो तर लोक एवढेच म्हणतील की, ‘कबूल आहे, माताजी होत्या आदिशक्ती ! मग काय! त्या स्वत:च त्या असल्यामुळे त्यांचं काय सांगता तुम्ही!’ तर तुमच्याकडे नजर होणार आहे लोकांची, की सहजयोग्यांमध्ये काय परिवर्तन आलं? त्यांच्या धर्माची स्थापना झाली का? कारण धर्मस्थापना होते ना पहिल्यांदा. कलियुगामध्ये धर्मस्थापना माताजींनी केली का? ती कुठे करणार? ती तुमच्या नाभी चक्रात. ন

तुमच्यातून तो धर्म आहे की नाही? तुम्ही धार्मिक आहात की नाही? ही आधी जर सिद्धता झाली, तर चार लोकांनी तुम्हाला पाहून म्हटलं पाहिजे, की ह्यांच्यामध्ये काय अंतर आलं आहे! काय मनुष्य झाला आहे! कमालीची ह्याच्यात चमक आलेली आहे! आमचा एक दीप असला तर लोक म्हणतील, की आहे तो पुष्कळ दिवसापासून, आकाशदीप लागलेला आहे. त्याचं काय माहात्म्य! आल्या आणि गेल्या! पण जे दीप आम्ही लावलेले आहेत ते कधी लावले नव्हते. म्हणजे दिवे पाजळले, मराठी भाषेत म्हणायचं म्हणजे. तर तसं झालं नाही पाहिजे. खरोखरच आम्ही दीप लावून दिवाळी सजवली. हे तुमच्या प्रकाशामुळे कळलं पाहिजे लोकांना आणि ह्याच्यापेक्षा मोठी जाहीर बातमी काहीही असू शकत नाही. उद्या आम्ही पेपरमध्ये दिसलो. फोटो आला. ‘व्वा! काय माताजींचे दिसतंच आहे मुळी! साक्षात् आहेत मुळी.’ ‘कबूल, पुढे काय? पण असं आहे, कितीही म्हटलं तरी त्या आदिशक्ती ! आमचं काय ?’ तर मग त्या भामट्याकडे कशाला जाता तुम्ही? तर म्हणे भामट्याकडे एवढ्यासाठी जायचं, की तो नुसती आपली कमाल दाखवत असतो. दोन पैसे दिले की खुश तबियत ! पण माताजी म्हणतात, की तुम्ही दाखवा कमाल! इथेच माताजींच चुकतं. त्यांना ज्या काही कमाली करायच्या आहेत त्या कराव्यात त्यांनी! पण आमच्याकडून अपेक्षा करतात, हे काय माताजींचे! पैसे म्हणतील तर देऊ आम्ही. काबाडकष्ट करा म्हणतील तर करू. पण आमच्याकडे धर्मस्थापना झाली पाहिजे. आमच्यामध्ये प्रेम दिसलं पाहिजे. संसारात लोकांनी म्हटलं पाहिजे, की काय चमकलाय मनुष्य! हे फार कठीण काम आहे बुवा! मग सहजयोग कसा जमणार? पण आम्हाला जे धंदे करायचे आहेत ते आम्ही करत राहू. मी आता परवाच सांगितलं की मी सिंगापूरला गेले होते. तर तिकडे एक गुरू बाबा, पळ काढत होते. कारण त्यांनी सगळ्यांना सांगितलं, की तुम्ही स्मगलिंग करा, काहीही करा. वाट्टेल तितक्या बायका ठेवा, पुरुष ठेवा. पण पैसे इकडे द्या मागे. शेवटी त्यांचं सगळ स्मगलिंगचे सामान पकडण्यात आले. तेव्हा ते आले माझ्याकडे. म्हटलं आता तुम्ही जाऊन त्यांना विचारा. तेव्हा ही गोष्ट माणसाला रुचतच नाही मुळी. आता कोणीही घ्या. मी म्हणते की किती तरी रियलाइज्ड साधू मी पाहिलेत. पुष्कळ पाहिले. ते आपले अंबरनाथला होते, महाराज आहेत ते. काही नाही. काही कोणाला करत नाही, काही नाही. मी म्हटलं, ‘तुम्ही काही म्हणत का नाही महाराज ?’ ‘मरू देत.’ कारण त्यांचं असं म्हणणं आहे, की त्यांची पात्रताच नाही मुळी ह्यांना कशाला द्यायचं? माझं तसं म्हणणं नाही. तुमची पात्रता आहे हे आधीच सांगितलं आहे मी. योग्यता आहे हे ही मी सांगितलं आणि हे दिलं आहे, हे ही खरं आहे. त्याबद्दल कोणालाही, तुमच्यातल्या कोणालाही शंका नाहीये. पण ते आतमध्ये भिनलं किती आहे ? त्याचा साक्षात्कार किती झाला आतमध्ये? तिकडे लक्ष असायला पाहिजे. आपल्या ज्या चुका आहेत किंवा जी बाजू लंगडी आहे ती बघितली पाहिजे. एक एक सहजयोगी म्हणजे दीपस्तंभासारखा आहे खरं पाहिलं तर! अहो, इतके गणेश बसवल्यावरती मला कशाला इकडे मरायला पाहिजे. इतकी मेहनत करायला पाहिजे! तुम्हीच सांगा मला! मला तंगड्या तोडायची काय गरज आहे जर तुमच्यासारखे एक एक तुम्ही बसवलेले आहेत. कुंडलिनी तुम्ही उठवू शकता. लोकांना पार करू शकता. एक एक मठ घालून बसलात तर लाखो रुपये तुमच्या पायावरती येणार. मला कशाला एवढी मेहनत करायला पाहिजे. फक्त एकच गोष्ट

कमी आहे, ती म्हणजे, अजून तुम्ही समजलेच नाही की तुम्हाला काय मिळालं आहे ते! अहो, ज्यांच्या जागृत्या झाल्या नाहीत त्यांनी सुद्धा आश्रमच्या आश्रम बांधले. ‘आम्ही सर्वसाधारण माणसं आहोत. घरगुती आहोत. गृहस्थाश्रमी आहोत.’ हे बाह्यातलं झालं, पण आतमध्ये काय तुम्ही? जिथे पाय पडेल तिथून बाधा पळणार आहे, मला माहिती आहे. दुधातून पाणी काढून वेगळे करणारी तुमच्यामध्ये शक्ती असतांना, हे सगळं तुम्हाला प्राप्त झाल्यावरसुद्धा तेजस्विता येत नाही तर आता त्याला काय मी कारण सांगू हे मला समजत नाही. चक्र धरतंय म्हणजे काय? एवढी मेहनत करायची तुम्हाला गरजच नाही मुळी! नुसतं निरपेक्षतेत, साक्षी स्वरूपात उभं राहिल्या बरोबर चक्र खाड्कन सुटणार. कारण मिथ्या आहे ते सगळं काही. मिथ्यतेतून फक्त आपण जिथे आहो तिथे उभं राहिल्याबरोबर सगळंच्या सगळे तुटून पडतं की नाही पहा बरं! नुसतं चिकटवा जरा आपल्याला तिकडे. थोडसं चित्त जरा आतमध्ये घ्यायचंय. उभे तिथेच आहेत, कपडेही तेच आहेत. वागणं तेच आहे. नवरा आहे, बायको आहे, मुलं आहे, बाळं आहेत, सगळा संसार आहे. कमाई आहे, पण चित्तात मात्र तुम्ही जर आतमध्ये उभे आहात तर सबंध संसाराची शक्ती तुमच्यामागे उभी आहे. हे लक्षात घ्यायला पाहिजे. ही पृथ्वी माता उभी आहे तुमच्या संरक्षणाला! हे सगळे तारेगण उभे आहेत तुमच्या संरक्षणाला. काय पाहिजे ते! पण सहजयोगावर बोलायचं सुद्धा तरी नव्या नवरी सारखं लाजता. अर्धवट लोकांसाठी सहजयोग नाही हे शंभर वेळा मी सांगितलं आहे. असाल खंबीर आणि वीर तर या. मला दोन असले तरी चालतील. पण ते यायला पाहिजे वीरत्व, घोडा दिला, घोड्यावर बसवलं, घोड्याला कसं चालवायचं शिकवलं, पण तरी रडतराऊ लोकं, म्हणजे करायचं तरी काय हे तुम्ही मला सांगा! आता काय तुम्हाला चिकटवायला पाहिजे का घोड्याला! चक्रं ही धरलीच नाही पाहिजे. खरोखर धरत नाहीत तुमची चक्रं. आता हे बघा. ह्याच्यात माया कशी आहे ती समजून घेतली की तुम्हाला कळेल मी काय म्हणते ते. चक्र धरतच नाही. तुम्ही यंत्र आहात. तुम्ही एक कॉम्प्युटरसारखे यंत्र आहात आणि तुम्हाला जी बातमी मिळते, ती तुम्ही सांगता, इन्फर्मेशन, आता समजा ह्यांचं जर आज्ञा धरलेलं आहे, तर तुमचं आज्ञा धरणार नाही तर तिथे इन्फर्मेशन आली. पण तुमचा तो भाऊ आहे, तर ‘माताजी, ह्याचं आज्ञा काढा बरं !’ म्हणजे तुम्ही आज्ञाधारी झाला. ‘हा माझा भाऊ, हा माझा चुलता, हे माझं अमकं, हे माझं तमकं, हा माझा मुलगा.’ म्हणजे धरतं ते ! तुम्ही तुमचे कोण आहात? तुम्ही तुमचे एकाकार तुमच्यामध्ये! तुमच्याच आनंदात, तुमच्याच राज्यात परिवहन करता आणि तिथे जे तुमचे आहेत, ते होते आणि राहणार. तर हे बाह्यातलं जरा सोडायला पाहिजे. म्हणजे चक्रं धरणार नाहीत. ती फक्त इन्फर्मेशन तुम्हाला येते आहे. कोणाला जास्त येणार, कोणाला कमी येणार. त्यामुळे तुमची चक्रं धरत नाहीये. मग त्याच्यावरच लक्ष! ‘माताजी, माझे हे धरलं. आता कसं काढू?’ आता कसलं तुझे धरलेलं आहे! शेजारच्या माणसाचं धरलंय म्हणून तुझे तसे येत आहे. म्हणजे मिथ्या गोष्टींकडे जी आशंका आहे, ती सोडायला पाहिजे. जे मिथ्या आहे त्याबद्दल काय आशंका? म्हणजे बागुलबुवा आपण म्हणतो तसं. हा नुसता बागुलबुवा तुम्ही धरत आहात. खरोखर त्याच्यामध्ये काहीही धरणं शक्यच नाही तुम्हाला. आता पुष्कळसे लोक असे म्हणतात, की कोणी होते गुरू. त्यांनी कोणाला अमकं दिलं तर त्यांना तो आजार झाला. तमक्यांनी तमक्याला बरं केलं तर त्यांना तो आजार झाला. तुमच्यातील कितीतरी लोकांनी ह्या

लोकांना व्हायब्रेशन्स देऊन ठीक केलेलं आहे! तुम्हाला माहिती आहे. कोणाला आजार झालेला आहे इथे ? साक्षात् गंगा तुमचे पाय धुवत असते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तुम्ही इथे उभे राहून, ‘मला धरलं , मला धरलं.’ म्हणजे हे आहे. सिंहासनावर बसायच्या लोकांनी असं वागायला नको. म्हणजे बाह्यातलं जे वागणं आहे, ते आतला भित्रेपणा, आतला कोतेपणा, त्यामुळे आहे. राजासारखं राहिलं पाहिजे. तुम्हाला काही हरकत तर नाही?’ म्हटलं, ‘तुम्ही राजे आहात. तेव्हा व्यक्तित्व असं पाहिजे, की चार माणसात उभे राहिलं की परवा दिल्लीला एक गृहस्थ भेटले. म्हणे, ‘मी फार साधा राहतो. शॅबीने राहतो. माताजी, वाटलं पाहिजे, की उभा आहे कोणीतरी मनुष्य. नाही तर सहजयोगी उभे करायचे म्हणजे लोकांनी म्हणायचं की कुठल्या कैदेतून आलेले हे लोक आहेत ! आपली फक्त स्थिती लक्षात घ्या, की माताजींनी जे दिलेले आहे ते काहीतरी विशेष आहे. अतिविशेष आहे हे मी सांगते आपल्याला. त्याची किमया मी सुद्धा शिकले, तेव्हा जमलंय ते. कारण तुमचे हे गोतावळे सगळे. तुमच्या कुंडलिन्या अशा अटकलेल्या. त्या कशा सोडवायच्या आणि तुम्हाला ह्या मार्गावर कसं आणून सोडायचं, तुम्हाला कसं इथे पोहोचवायचं, ही सगळी मेहनत आधी केली आणि तुम्हाला तिकडे सोडवलेले आहे. पहिल्यांदा आपला धर्म स्थापन केला पाहिजे. धर्म फार जरुरी आहे. माणसामध्ये आपला धर्म जर हलत असला, तर सहजयोग जमत नाही. फार सोपं काम आहे धर्माचं. ‘अति वर्जयेत् ‘ जे काही अती आहे ते सोडायचं. पहिलं म्हणजे, मध्यावर रहायचं आणि अती काही करायचं नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये अतिशयता नसली पाहिजे. हट्ट नसला पाहिजे. वेड्यासारखं एखाद्याच्या मागे लागावं तसं नसलं पाहिजे. हसत खेळत सहज अगदी. अती म्हणजे अती वज्णेये. आता धर्मामध्ये काय! एक साधी गोष्ट दारू प्यायची नाही. तंबाखू ओढायची नाही. अशा राक्षसी ह्या वनस्पती आहेत. दारू हे एक तऱ्हेचं राक्षसी मादक पेय आहे. लिक्विड आहे. अशा तऱ्हा आहेत. राक्षसीसुद्धा वस्तू आहेत जगामध्ये. त्या वापरू नका. खाण्याचं सुद्धा अती करू नये. विशेषत: गृहस्थाश्रमी लोकांना हा त्रास आहे, की खायचं असलं की, खाण्याबद्दल जरा जास्तच उत्सुकता असते. ‘काय? काय बेत आहे? काहीतरी चमचमीत करूया!’ मग बसल्या बायका पुरुषांच्या डोक्यावर. त्यांची जीभ खराब करून करून. खाण्याचं सुद्धा अती करायचं सारखं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आयांनी मुलांना खराब करायचं. बायकांनी नवर्याला खराब करायचं. हे सुद्धा एक वेड आहे नुसतं. आणि मग लिव्हर खराब. अती वर्जयेत्! नाहीतर उपवासाचा वेडेपणा. खायचेच नाही मुळी. उपवास! हे खायचं नाही, ते खायचं नाही. आठवड्यातून सात दिवस उपवास! आणि नुसता फलाहार करायचा. खाण्याचं सुद्धा अती करायचं नाही. कपड्यांचं सुद्धा. एक तर नागवे फिरतील, नाही तर कपडे रोज तीन तीन बदलतील. काही मध्ये चालतं की नाही तुमचं! स्वच्छ, व्यवस्थित, उत्तम, साजेल असे कपडे घालायचे अंगावर. त्याच्यातही अती लक्ष नको. गृहस्थाश्रमी लोकांना फार जरुरी आहे. त्यांना एकच फायदा असतो, की मुलंबाळे झाल्यामुळे, काही अती केलं तर मुलं काढतात त्यांची खरडपट्टी. एखादा असा वेडा घरात असला, की लोक हसतात मग त्याला. मुलं हसू लागली की मग त्या वेड्याचा एक तर ….(अस्पष्ट) तरी होतो, आणि नाहीतर सोडून तरी देतो. तेव्हा अती वज्ज्य करायचे. प्रत्येक बाबतीमध्ये अती वज्ज्य. आणि ज्या गोष्टी सैतानाच्या राज्यातल्या आहेत, तिकडे लक्ष ठेवायचं

नाही. आता मनुष्याचा सगळ्यात मोठा धर्म तरी काय? जर मला कोणी विचारेल की, ‘माताजी, मनुष्याचा कोणता सगळ्यात मोठा सद्गुण आहे?’ तर आता इतक्या लोकांना पाहिल्यावर एकच मला वाटतं, की फार जरुरी आहे, की हा जो तुमचा माथा आहे ना, हा कोणाही समोर वाकवायचाच नाही मुळी! हा जर माथा तुमचा वाकवला तुम्ही, मग रियलायझेशन फारच कठीण जातं. हे सगळे भामटे आलेले आहेत. त्यांच्यासमोर जाऊन आपलं डोकं टेकायचं! सहजयोग्यांनी तर कोणाही समोर वाकायची गरज नाही. दुसर्या सहजयोगी किंवा योगी माणसासमोर डोकं वाकवण्याची गरज नाही. तुम्ही काय कमी आहात! आज्ञा चक्र धरलंच पाहिजे आणि ते असं धरतं की ते सुटता सुटत नाही. कारण तुमच्यावर कोणी नाही, हे सांगते मी तुम्हाला. जर तुम्ही गणेशाच्या स्टाइलमध्ये आहात तर ब्रह्मा, विष्णू, महेशसुद्धा तुमच्यापुढे जाऊ शकणार नाहीत. …(अस्पष्ट) या तुम्ही मग बघा. बघा तुम्ही व्हायब्रेशन्स तर बघा! मी बोलते ते खरं आहे की खोटं आहे! फक्त जसं माझं नाव आहे निर्मल, तसं तुम्ही स्वत:ला निर्मळ ठेवा फक्त. ‘फक्त’ हा शब्द आहे. ब्रह्मा, विष्णू, महेशसुद्धा तुम्हाला हात लावू शकणार नाहीत. तुम्ही कोणासमोर जाऊन माथा टेकवण्याची काही गरज नाहीये. एवढे सगळे गुरु बाबा लोक आहेत नां, कोणी माझ्या डोक्याला हात लावू शकत नाही. गंगासुसद्धा माझ्या डोक्यावर चढ़ू शकत नाही. पण तुम्ही लोक माझ्या डोक्यावर हात ठेवू शकता. आलं का लक्षात? तेव्हा ही तुमची स्थिती असतांना, एवढ्या मोठ्या पदावर बसले असतांना, स्वत: विषयी बरोबर कल्पना न ठेवणे, हे सहज नाही. म्हणजे आता काही गर्व करायला नको. आता कोणी म्हणेल की आदिशक्ती तर असा गर्व का? म्हणजे आम्ही आहोतच. ह्याच्यात गर्व कसा? म्हणजे आमचं काही वैशिष्ट्य नाही त्याच्यामध्ये. आम्ही आहोतच. तसेच आहोत. तसेच जर तुम्ही सहजयोगी आहात, तर आहात. त्याच्यात गर्व कसला? पण जे आहात ते रहा.. आता समजा, कोणी जर हिरा असला तर त्याच्यात चमक येणारच. हिऱ्याला काही गर्व चढतो का? त्याच्या उलट पाश्चिमात्य देशात आहे. तिकडे भयंकर अहंकार आहे लोकांना ! ते स्वत:ला लाटसाहेब समजतात. म्हणून इकडून गेलेत त्यांना नागवायला लोक. छाटून एक्सपोर्ट करून. एक्सपोर्ट क्वालिटी. छाटून बदमाश पाठवलेत. त्या सगळ्यांचा अहंकार तडाकू तोडलाय की बस! गाढवासारखे आता चिलीम घेऊन फिरतात. इतके मूर्ख आहेत. ते इतके महामूर्ख आहेत, की त्यांच्या मूर्खपणाचं मी वर्णन करू शकत नाही. तुम्हाला सांगेन कधीतरी. आता मुलंबाळे आहेत. सांगण्यासारखं नाही. त्यांनी आपल्या त्या अहंकारामध्ये महामूर्खपणाची पदवी मिळविलेली आहे. म्हणजे त्याला पदवी दानच देता येणार नाही. म्हणजे इतके मूर्ख आहेत ते, की वाट्टेल ते करतील, मूर्खपणासाठी. म्हणजे आपल्याकडे केडेसुद्धा तसं करणार नाहीत. तर ती एक तऱ्हा झाली. तुमची दुसरी तऱ्हा. तुम्ही लोक कितीही म्हटलं तरी तसेच राहणार आणि त्यांना कितीही म्हटलं की अहो, डोकं खाली करा. तरी ते वरती येणारच. म्हणजे अशा दोन तऱ्हेच्या लोकांवर आम्ही कुठे? थोडी तरी जागा आता सहजयोग्यांच्यामुळे झालेली आहे मधोमध. थोडीशी जागा. ती जरा वाढवायची आहे. मग काम बघा आमचं तुम्ही! तेव्हा सहजयोग्यांनी काय करायचं? पहिल्यांदा आपला धर्म स्थापन करायला पाहिजे, नंतर काम. या

बाबतीत जाणलं पाहिजे, की पवित्रता असायला पाहिजे. आपल्या पत्नीशिवाय दुसर्या कोणत्याही स्त्री कडे आई स्वरूपातच पाहिलं पाहिजे. कठीण नाही.. ती एक फारच सोपी गोष्ट आहे, पण आजकालच्या कलियुगात इतकी घाण पसरलेली आहे की नाकातच घुसते, डोळ्यातच घुसते. पूर्वी मला आठवते आमचे आई-वडील सांगायचे की सगळ्यांनी खाली डोळे करून चालायचं. वर डोळे करून कुणी चाललं तर शेजारीपाजारी लगेच आईला जाऊन सांगायचे,’तुमची मुलगी अशी वर डोळे करून चालली होती.’ झालं, मग आमचे अनेक अपराध झाले की त्यावर आईनी ओरडायचं मुलींवर. वडिलांना जर कुणी सांगितलं, ‘अहो, तुमचा तो नाना डोळे वर करून चालला होता’, मग नानाची कंबख्ती आली. त्याचं खाणं – पिणं बंद. ‘तू वर डोळे करून का बघत चालला होता, लक्ष कुठे होतं तुझे?’ लक्ष कुठे आहे हा पहिला प्रश्न असायचा. ही मी सांगते ती पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट! पण आता तुम्ही स्वतंत्र झाल्यामुळे बेछूटपणा जो आलेला आहे त्यामुळे जी प्रकरणं आपण केलेली , त्याबद्दल लक्षात घेतलं पाहिजे की डोळे जमिनीवर ठेवायचे. ती तुमची आजी आहे. डोळे नेहमी जमिनीवर ठेवायचे. तिच्या आशीर्वादात राहायचं. स्वत:ला नम्र करून पृथ्वीच्या शरणात राहिलं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे अर्थ. पैशाच्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत मनुष्याने कसे वागले पाहिजे ? सारखी पैशाची हाव ठेवून पैसे मिळत नाहीत किंवा दुसर्याकडे दोन वस्तू जास्त आहेत म्हणून अधाशासारखे तिकडे बघूनही पैसे मिळत नाहीत आणि त्याच्याजवळ पैसे आहेत म्हणून त्याचा गळा कापूनही पैसे मिळत नाहीत आणि ज्यांना पैसे मिळतात त्यांनासुद्धा सुख आणि आनंद मिळत नाही हे तुम्ही पाहिलेले आहे. आता बुद्धीनेच हा विचार तुम्ही कायम करू शकता की पैशाने सुख मिळत नाही तर मग कशाने मिळतं ? पण पैसा एक अंग आहे, मग पैशाचे कोणते अंग आहे. तेव्हा लक्ष्मी नावाचं स्वरूप मी पूर्वी सांगितलं होतं , तसं स्वरूप असायला पाहिजे समाधानी, समाधानी वृत्ती. जे मिळेल ते स्वीकार करण्यामध्ये मनुष्य राजा होऊन जातो. अहो, ज्याला समाधान आहे तोच राजा. जो समाधानी नाही तो भिकारीच आहे. साधा हिशेब असतो. ज्याला समाधान नाही तो कितीही जरी मोठा असला, स्वत:ला मोठे मानत असला तरी तो भिकारी आहे आणि ज्याला समाधान आहे तो दिसायला जरी गरीब दिसला तरी तो राजा. तेव्हा समाधान मानायला पाहिजे आणि ते तुम्हासाठी कठीण नाही. सहजयोगामध्ये ते दिलय आम्ही तुम्हाला, ते म्हणजे समाधान मानण्याची शक्ती. आता कसं मानून घ्यायचं आणि कसं करायचं ते ही थोडं सांगते मी. कारण हे सगळे प्रश्न माणसाला येतात विचारांच्यामुळे. जर तुमच्यात विचारच आले नाहीत तर प्रश्नही येणार नाहीत. तर कोणत्याही गोष्टीवर विचार जास्त सुरू झाला, अतीवर गेला की विचार उचलायचा आणि फेकायचा माताजींच्या चरणावर. ज्याला आपण अचेतन मन म्हणतो, अनकॉन्शस माईंड, ते तिथे आहे. तो सगळा विचार तिथे फेकायचा. मग आम्ही तो उचलतो. तुम्हाला प्रश्न आहे न उद्याच्या इन्कमटॅक्सचा, मग विचार करू नका. तो आणून आमच्या पायावर फेकायचा. तो जसा तुम्हाला हवा तसा होणार नाही. पण जे तुम्हाला हितकारी आहे ते होईल. हितकारी होईल आणि तेच खरं लाभदायी असते.