Shri Adi Bhoomi Devi Puja

Pune (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Marathi Transcription – Bhoomi Devi Puja Date 4th February 1985: Place Pune – Type Puja

(Starts at 12:48)

इतकी सगळी व्यवस्था तुम्ही सर्व सहजयोग्यांनी मिळून केली, ते बघून असं वाटतं, की पुण्याला राहण्याचं जे आम्ही निश्चित केलं होतं, त्याला काहीतरी विशेष प्रेमाचं कारण असायला पाहिजे. तशी अनेक कारणं आहेत पण मुख्य मला असं वाटतं तुम्हा लोकांच्या प्रेमाच्या ओढीनेच या पुण्यनगरीत वास्तव्य करण्याचे आम्ही ठरविलेले आहे. एकंदरीत इथे जागा मिळणे, त्यात कार्य होणे वगैरे म्हणजे एक विशेषच घटना आहे. पण मुख्य म्हणजे पुण्याला अत्यंत पुण्याईचा साचा आहे, साठा आहे त्याचा. आणि साचा पण आहे. इथे मनुष्य पुण्याईत घडविली जाऊ शकतात. पण अनेक इथे उपद्रव झालेले आहेत आणि ते उपद्रव होणारच. कारण जेव्हा माणसं पुण्याईत घडविली जातात, तेव्हा त्यांच्यावरती आघात करायलासुद्धा, असुरी विद्या ही सगळीकडे कार्यान्वित असते. विशेषकरून अशा ठिकाणी, जिथे काहीतरी पुण्य घडविलं जातं. तेव्हा आपण आणखीन सचोटीने, आणखीन सतर्कतेने काळजीपूर्वक सहजयोग साधला पाहिजे. आणि पुणे हे महाराष्ट्राचं ब्रीद आहे. इतकंच नव्हे की पुण्य आहे, पण हे ब्रीद आहे. आणि ह्या ब्रीदामध्ये जर का चैतन्य फुंकल गेलं, तर आपल्या सबंध महाराष्ट्रात त्याचा परिणाम आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा तुम्हा सर्वांची ह्यामध्ये मला मदत पाहिजे.

      सर्वप्रथम हे लक्षात ठेवलं पाहिजे, की घर बांधणं वगैरे हे काही विशेष महत्त्वाचं नाहीये आणि ते सोपं काम आहे. पण ह्या घराबरोबरच, जर पुण्यातले सहजयोगीसुद्धा बांधले गेले आणि त्यांना सुंदर स्वरूप आलं, तर मला फार आनंद होईल. ही एक फार मोठी गोष्ट आहे, की आज इथे आपण भूमीपूजनाला आलो, सगळे एवढे संत- साधू आले आहेत. भूमीपूजन करीत आहेत आणि ह्या भूमीपूजनाचा लाभ अनंत काळापर्यंत लोकांना मिळणार आहे. तेव्हा आजचा जो विशेष समारंभ आहे, त्याला एक विशेष फार मोठी अशी मला वाटतं, महत्त्वाची बाजू आहे. ती सांभाळली पाहिजे. तुमच्या आधारावरच सहजयोग उभा आहे. कालच मी बोलताना म्हटलं, की आता थोडी त्यागाचीसुद्धा तयारी केली पाहिजे. अजूनपर्यंत सहजयोगाचे नुसते आपण फायदे बघत गेलो. हरतऱ्हेचे फायदे आहेत. सहजयोगात पैशाचा फायदा आहे, नोकरीचा फायदा आहे, तब्येतीचा फायदा आहे. त्याच्यानंतर सगळ्यांशी आपली नातीगोती ठीक होतात. लग्न होतात. पुष्कळसे प्रश्न एकदमच सुटून जातात. पण मुख्य प्रश्न असा आहे, की आपली काय प्रगती झाली! आपण त्यातनं जे मिळवलं ते सगळे बाह्यातलं आहे. आतलं आपण किती मिळवलं, त्यासाठी त्यागबुद्धी पाहिजे. पण बहुतेक लोक बुद्धीलाच त्यागून देतात. त्यामुळे प्रश्न असा आहे, की त्यांच्यापुढे कोणतीही गोष्ट मांडली, म्हणजे ते प्रत्येक या दृष्टीने विचार करतात की, ह्यात आम्हाला कोणता लाभ होणार आहे? अजूनसुद्धा पुष्कळ सहजयोगी असे आहेत, त्यांना असं वाटतं की,  सहजयोगात आलं म्हणजे आपण थोडे पैसेच कमवून घेऊ. नाहीतर त्याने हा लाभ होईल, तो लाभ होईल . तेव्हा दृष्टी कोती ठेवली तर कोतंच होणार आहे सगळें.

     एकंदरीत हे जे काही आहे आणि झालेलं आहे, त्यात सर्व परमेश्वरी हात आहे आणि परमेश्वरी कार्य आहे. तेव्हा जरी बाहेर दिसायला हे घर वगैरे आपण बांधतो आहे, तरी प्रतीक रूपाने जाणलं पाहिजे की फार मोठी गोष्ट आपण इथे मिळविलेली आहे. कारण सबंध जागतिक जे केंद्र आहे सहजयोगाचं ते पुण्याला होणार आहे. पण त्याच्याच बरोबर दांभिक लोक, ढोंगी लोक, किंवा असे लोक जे सहजयोगामध्ये सहजयोगात लाभार्थी येतात, त्यांना आपण म्हणू कामार्थी लोक, अशा लोकांचा मात्र तुम्ही जरा विचार ठेवला पाहिजे आणि अशा लोकांना दूर  ठेवलं पाहिजे. हळूहळू जी चांगली मंडळी आहेत, ती  कितीही, कशीही असली, तरी स्वच्छ होऊन सहजयोगाला पात्र होतील. पण अशी मंडळी जी मनातून वाईट आणि मनातून इतर विचार घेऊन येतात, अशा मंडळींना काहीही आपण करू शकत नाही, तेव्हा अशा मंडळींना बाहेरच ठेवलेलं बरं! आणि त्यांना स्पष्ट सांगावं की, आमच्याच्याने हे होऊ शकत नाही.

      ह्या उपरांत आता माझं वास्तव्य इथे राहणारच आहे. मी राहणारच इथे आणि सगळं सहजयोगाचं कार्य होणार आहे. फक्त सांगायचं असं आहे, की हे घर आम्ही बांधतो आहे ते आमच्या साहेबांच्या पैशाने आणि त्यांच्या मिळकतीने बांधतो आहे. आणि त्यामुळे इथे जर त्यांना त्रास झाला तर ते इथून उठून दुसरीकडे निघून जातील. सहजयोग्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, की माताजींना त्रास नाही दिला पाहिजे. आता प्रत्येकाला, ‘आम्ही दर्शनाला आलो,’ आता हे काही देऊळ नाहीये. जिवंत मनुष्य आहे नां! प्रत्येकाचं , ‘नुसतं एक दर्शन घेऊ द्या.’ वाट्टेल तेव्हा पोहोचायचं, ‘मी मुद्दामून दर्शनाला आलो. ‘ सकाळी सहाला पोहोचले. ‘काहो, कसं काय?’ ‘अहो, मी मुद्दामून दर्शनाला आलो माताजींच्या.’ आता माताजी तिथे काय देवळात बसलेल्या आहेत! जो आला त्याला दर्शन दिलं, पण देवळातसुद्धा प्रत्येकाला दर्शन कसं मिळतं गेल्याबरोबर. मग हट्ट करायचा, ‘आम्ही इतक्या ह्याने आलो. तुम्ही आम्हाला दर्शन देत नाही. अमकं नाही. तुम्ही असे, तसे.’ तर हा प्रकार गेला पाहिजे. ही फारच अगदी निम्न श्रेणीतली गोष्ट आहे. कारण आपल्याला हे समजतच नाही, की माताजींच कार्य काय आहे? त्या केवढ्या त्याच्यात व्यस्त आहेत? आपला त्यांच्यावर काय अधिकार आहे ? प्रत्येकाला असं वाटतं, की माताजींच्या प्रत्येक क्षणावर आपला अधिकार आहे. त्यांचा सबंध टाईम म्हणजे आपलाच आहे. तेव्हा आपला टाईम आपण माताजींना दिला पाहिजे. माताजींचा टाइम नाही घेतला पाहिजे. लोकांना हे कळत नाही, जो तो येऊन दारात उभा राहतो. म्हणजे मला अगदी घाबरायला होऊन जातं, सगळे दारात उभे. दाराच्या बाहेर निघण्याची सोय नाही. तर इकडे कोणी फिरकायचं नाही, जो खरा सहजयोगी असेल तो मला त्रास देणार नाही. ही पहिली ओळख आहे. जो मनुष्य माझ्या पायाला धरून जोराने डोकं रगडतो, तो का रगडतो मला समजत नाही. पण तो काही खरा सहजयोगी नाही. उलट खोटा सहजयोगी आहे, जो नुसते असे पाय धरून आणि डोकं रगडत असतो.

दुसरं मी बसलेले असताना डोळे मिटायची काही गरज नाही. पण पुष्कळ लोक डोळे मिटून बसतात. त्याचं मला मोठ आश्चर्य वाटतं. डोळे मिटण्याची काय गरज आहे ? किंवा मी बसलेले असतांना फोटोला नमस्कार पहिल्यांदा करतात, मग मला येऊन नमस्कार करतात.

    तर म्हणजे असं, की माणसाने विचारही ठेवला पाहिजे आणि दांभिकपणा नसला पाहिजे. दांभिक माणसं लगेच लक्षात येतात. तेव्हा ढोंगी, दांभिक लोक आहेत त्यांना डोक्यावर बसवायचं नाही. कारण त्यांचं हे इतकं मोठं आहे. त्यांचा एवढा  मोठा कारखाना आहे. असेल आम्हाला काय त्याचं! एवढे कारखानदार झाले म्हणजे तुम्हाला कोणी काही दिलं का? त्यांनी काही मदत केली का? पुन्हा ह्यांच्याजवळ एवढे पैसे आहेत, माताजी, हे असे आहेत. काही नाही. नुसते हे अप्पलपोटे लोक आहेत ! तेव्हा ज्यांना धर्म हवा असेल, ज्यांना परमात्मा हवा असेल अशाच लोकांनी सहजयोगात यायचं. मग ते जरी मोजके दहा असले तरी चालतील. कारण परमेश्वराच्या साम्राज्यातसुद्धा जागा कुठे आहे आता? फार कमी जागा आहे. तेव्हा त्यात किती लोक बसणार, हे परमेश्वरानेच ठरवायला पाहिजे. नसते उपटसुंभ बसवायला काही परमेश्वर, आपल्यासारखा नाही. त्याला फार अक्कल आहे. नसते बाजारबुणगे बसवायला तो काही तयार नाही. त्याला अशी मंडळी पाहिजेत, जी खरी, अस्सल आहेत. हे सगळे बाजारबुणगे इकडेच पडून राहणार. म्हणून अशा लोकांचीच दोस्ती केली पाहिजे, अशा लोकांना बोलवलं पाहिजे, अशा लोकांशी मैत्री केली पाहिजे, की ज्या लोकांमध्ये खरोखर परमेश्वराची आवड आहे आणि जे उच्चपदाला जाऊ इच्छितात आणि परत सांगते, की त्यागही केला पाहिजे. त्याग करणं फार जरूरी आहे. ह्या स्थितीला आल्यावरती काही ना काही त्याग केला पाहिजे. आणि त्यात म्हणजे लहानलहान गोष्टींमध्ये नाही रहायला पाहिजे. आता मी म्हटलं, की पाषाणला आपण जमीन घेऊ किंवा कुठे घेऊ, तर लोक म्हणतील, की तिथून दूर पडतं. आता हे किती दूर आहे आम्हाला! मी तर साहेबांना सांगितलं सुद्धा नाही, की जंगलातच घेतलं आहे म्हणून. बांधूनबिंधुन झाल्यावर तिथे आता काय बोलणार मग ते बिचारे! पण अगदी आम्ही इतक्या जंगलात कधी राहिलो नव्हतो. पण तुमच्यासाठी म्हणून, जंगलात जागा मिळाली तर जंगलात येऊन राहतोय. तसं प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे, की जर माताजी, ह्या वयामध्ये इतकं करतात तर आम्हाला मात्र प्रत्येक गोष्टीत सोय असली पाहिजे, असं असलं पाहिजे. तेव्हा सहजयोग म्हणजे काय प्रत्येकासाठी एक अवलंबन नसलं  पाहिजे. अवलंबन नसलं पाहिजे, की सहजयोग आहे, अवलंबन आहे. आम्ही सहजयोगात आलो ना माताजी, मग आता आमचं असं करून द्या. मग माझ्या मुलाला ठीक करून द्या. मग माझ्या बायकोला ठीक करून द्या. मग माझ्या सगळ्या खानदानाला ठीक करून द्या. म्हणजे सहजयोग म्हणजे एक खैराती हॉस्पीटल असंच दिसतंय. तेव्हा तुम्ही आधी जी थोडी मंडळी आहेत त्यांनी सहजयोगाबद्दल पूर्ण कल्पना करून घेतली पाहिजे आणि तुम्ही जर खंबीर झालात, तर आपण सगळ्यांना ठीक करू शकतो.

   आज इतका चांगला दिवस आहे! आज परत विनायक चतुर्थी आहे. फार सुंदर आहे आजचा दिवस! एक विशेष काहीतरी त्याच्यामध्ये होतं. आहे का पंचांग? पंचांगात आज एक विशेष योग आहे, असं लिहिलेले आहे. तेव्हा आजचा दिवसही फार छान आहे आणि ह्यादिवशी आपण एवढ्या शुभकार्याला लागलो आहोत, आणि आमचं वानप्रस्थाश्रम सुरू झालं आहे, असं दिसतंय आता! ह्या वानप्रस्थाश्रमाच्या गोष्टी आहेत.

 ( Gap till 24:18, Sahaj Yogi searching in panchang from  23:57 to 24:18) 

सहज योगी : महर्ग पुण्यकाल  

महर्ग, बघितलं, मी आत्ताच म्हटलं तुम्हाला महर्ग पुण्यकाल. केवढा मोठा मुहूर्त आहे. महर्ग म्हणजे काय झालं! अर्घ्य म्हणजे , महर्ग , अर्घ्य, अर्घ्य म्हणजे पाणी घालणे. अर्घ्य देणे. अर्घ्य देणे.  आता ह्या तुमच्या जमिनीला पाणी दिलं पाहिजे. तुम्हाला पाऊस आला पाहिजे. सगळी काही व्यवस्था केली पाहिजे. पण आपणही पात्र असायला पाहिजे. सहजयोगी पात्र आहेत की नाही हे बघितलं पाहिजे. जरासुद्धा तसदी न घेतांना सहजयोग जमला तर बरं आणि जेवढं काही घबाड मिळेल तेवढं घ्यावं. आज फार मोठं आहे बघा. महर्ग पुण्य आहे आज. मी आधीच सांगितलं होतं आपल्याला. तेव्हा आजचा विशेष दिवस आहे, सगळ्यांनी इतका मला आल्हाद दिला आणि आनंद दिला आणि इथे आले तुम्ही, इतका त्रास घेतलात, तसाच सहजयोगासाठी सगळ्यांनी त्रास घ्यावा अशी मी हात जोडून विनंती करते. 

Concluded at 25:22.