Public Program, Dharmachi Durgati Jhali aahe

Dhule (India)

1983-01-17 Public Program Day 2, Dhule, India, DP-RAW, 39'
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: View on Youku: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

 Public program, Day 2, Dhule, India, 17-01-1983

  नाशिकचे मान्यवर कलेक्टर साहेब तशेच सहजयोगी व्यवस्थापक आणि नाशिकची भाविक मंडळी या सर्वांना माझा नमस्कार. आम्ही बाहत्तर साली नाशिकला आलो होतो, त्यावेळेला सहजयोग नुकताच सुरु झाला होता, आणि बरीच मंडळी त्यावेळेला इथे साक्षात्कार पावून पावन झाली होती आणि त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन सहजयोग वाढवला, पण नाशकाला कार्य मात्र तसंच राहिलं. आता डॉक्टर साळवी इथं आलेले आहेत, आणि मधून मधून इतर मुंबईची मंडळी सुद्धा इथं येत असतात, त्यामुळे मला पूर्ण आशा आहे की सहजयोग इथे सुद्धा फोफावेल. सर्व प्रथम, सर्व गोष्टी विसरून धर्म आदी किंवा सायन्सच्या वगैरे एक मनुष्याने असा विचार केला पाहिजे की आम्ही ह्या संसारात कशासाठी आलो? आमच्या जीवनाचं लक्ष्य काय आहे? जर आम्ही एका अमिबापासून आज मानवस्थितीला आलो तर ते कशासाठी? या जीवनाला काही अर्थ आहे किंवा नाही? अर्थात या भारतभूमीमध्ये विशेषतः महाराष्ट्रात जिथे आपली साडे तीन पीठे बसली आहेत, विश्वाची सर्व कुंडलिनी आहे, अशा महान देशामध्ये जन्मलेल्या लोकांना हे तर माहीतच आहे की या संसारातून ज्याला आत्मसाक्षात्कार मिळाला तो महान झाला तेच सगळ्यात मोठं मिळवायचं आहे. त्यातून काही नवीन नवीन मंडळी पाश्चिमात्य देशात जाऊन शिक्षण घेऊन आली आणि त्यांना असा प्रश्न पडलेला असतो की देव वगैरे काही नसतो, आहे की नाही किंवा हे जे काही कुंडलिनी बद्दल एवढं मोठं लिहिलेलं आहे, ते ज्ञानेश्वर आपल्या सहाव्या अध्यायात सांगून गेलेत. तुकारामांनी ज्या परमात्म्याला मिळवण्याच्या गोष्टी केल्या. नामदेव आदी अनेक संतांनी या भूमीवर परमेश्वराच्या बद्दल जे सृजन केलेले आहे ते खरं होतं की खोटं होतं? ते खरे होते किंवा भ्रमित होते? त्यांनी जी गोष्ट केली त्याच्यात काही अर्थ होता की उगीचंच त्यांनी काहीतरी करायचं, सांगायचं म्हणून सांगितलं. आता सांगायचं म्हणजे असं आहे की जे आपलं बाह्य नॉलेज आहे किंवा बाह्य जे ज्ञान आहे किंवा ज्याला आपण सायन्स बियंस म्हणतो, हे सगळं एखादया झाडाचं ज्ञान असावं तसं आहे झाड हे बाहेर आहे आणि मूळ आतमध्ये आहे. जर मूळ नसेल तर झाडाला काही अर्थ नसतो हे आपल्याला माहिती आहे कारण आपण पाहिलेही आहे. पण या झाडाचं मूळ उलट आहे, असं श्रीकृष्णानं सांगितलं की मूळ वरून येतंय खाली झाड आणि आपण जर झाडातच असलो तर आपल्याला त्या मुळाकडे जावसं वाटतं ते सहजच आहे, वाटलं पाहिजे की या झाडाचं मूळ काय आहे? सहज असं वाटायला पाहिजे माणसाला की या शरीराचं तरी मूळ काय? या आपल्या मानव देहाचं तरी मूळ काय? किंवा त्याच्यापेक्षाही या संबंध आपल्या व्यक्तित्वाचं आणि आपल्या ह्या मानवी जीवनाचं तरी मूळ काय. पण त्या मुळात जाण्यासाठी काय केलं पाहिजे? पुष्कळांनी त्यातल्या अनेक तर-तऱ्हा सांगितलेल्या आहेत. तुम्ही असं केलं तर तुम्हांला मुळाचं ज्ञान होईल. तसं केलं तर मुळाचं ज्ञान होईल वगैरे. पण एक साधी गोष्ट आपण ठेवली पाहिजे की, मानव स्थितीत यायला आपण काय केलेलं आहे? काहीही केलं नाही. किती पैशे मोजले? मुळीच पैशे मोजले नाहीत. डोक्यावर उभे राहिलो का? किंवा काही ध्यान-संध्या वगैरे असं काही केलेलंय का? काही केलं नाही. सहजंच झालं तसंच जेवढया जिवंत क्रिया जगातल्या इतक्या त्या सहजच होत असतात. एका बी ला तुम्ही जर कितीही प्रार्थना करा किंवा तिच्यासमोर कितीही पारायणं करा, काहीही करा याला काही जिवंत स्वरूप येणार नाही, म्हणजे ते काही रोकलं जाणार नाही. पण त्याच्यात जर अंकुर काढायचे असले तर तुम्हांला आईच्या उदरात घालावं लागेल त्या आईलाच ही शक्ती आहे की त्याला ती अंकुर फोडू शकते. तेव्हा तुम्ही काहीही वाद-विवाद न करताना सरळ जाऊन जेव्हा काही पेरणी करायची असेल तेव्हा बिया आईच्या उदरात घालता, त्याबद्दल तुम्ही काही वाद- विवाद करत नाही कारण तुम्ही पाहिलेलंच आहे, त्याच्यासमोर काही पुस्तकं वाचत नाहीत किंवा लायब्ररीत घेऊन जात नाहीत, की त्याचं डिसेक्शन करून मायक्रोस्कोप मध्ये बघत बसत नाही. सरळ जाऊन ते तुम्ही आईच्या उदरात घालता, आणि तिथेच ते जिवंत कार्य होते आणि तुम्ही जेव्हा मानव झाला आहात, हे जिवंत कार्य सुद्धा सहजच घडलेलं आहे. मराठी भाषेत सहजचा अर्थ आहे म्हणजे काही त्रास न घेता. पण तसा संस्कृत अर्थ ‘सह’ म्हणजे तुमच्या बरोबर आणि ‘ज’ म्हणजे जन्मलेला. हा योग ‘सहजयोग’ हा तुमच्याबरोबर जन्मलेला आहे, म्हणजे त्याची परिस्थिती एका मानव स्थितीत आहे आणि ती स्थिती आपल्यामध्ये असल्यामुळे आपल्याला तो मिळाला पाहिजे, हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, इतकंच नव्हे हे घटित झालंच पाहिजे, म्हणजे मानव ज्या स्थितीला आता आलेला आहे, ती स्थिती संपूर्ण नाही. हे आपल्याला दिसतंच आहे की जर ही स्थिती संपूर्ण असती तर एवढे वाद-विवाद, त्रास, भांडणं, अधोगती, अमुक-तमुक हे कशाला झालं असतं, कारण मनुष्य अजून संपूर्णत्वाला पोचलेला नाही. त्याला त्याचा अर्थ अजून मिळालेला नाही आणि जोपर्यंत त्याला त्याचा अर्थ मिळालेला नाही, तोपर्यंत ही सर्व स्थिती अशी राहणार. जर तुम्ही अंधारात या खोलीत आलात समजा तर काही तुम्हांला समजणार नाही, तुम्हांला असं वाटेल हा खांब आहे हाच सत्य स्वरूप आहे, काही खुर्ची दिसली तर खुर्चीच सत्यस्वरूप आहे, पण एकदम जर ह्याच्यात दिवा लावला तर तुमच्या सगळे दृष्टिपथात येईल की आहे काय किंवा वास्तविकता काय पण हा दिवा लावायची सुद्धा क्रिया म्हणजे बघा किती सहज आहे. नुसतं एक बटन दाबलं की सगळीकडे प्रकाश होतो. पण जरी हा प्रकाश इतका सहज घडला तरी ह्याला एक फार मोठी पूर्वपिठिका आहे. इतकंच नव्हे पण एक इतिहास आहे आणि त्या इतिहासाच्या वर हे जे काही संशोधन लावून त्याच्यावर आता ही जी तुम्हांला काही व्यवस्था झाली आहे. ती फक्त एका बटनावर येऊन बसली आहे. एक बटन दाबलं की सगळीकडे प्रकाश होतो आणि आपल्याला दिसत जातं. तसाच आजचा सहजयोग सुद्धा अनादी आहे आणि तो घटत घटत आज या स्थितीला आलाय की त्याला आपण महायोग म्हटलं पाहिजे. ज्ञानेश्वरांनी याला महायोग म्हटलं आहे. इतकंच नाही त्याचं पसायदान आहे ते संबंध सहजयोगाचं वर्णन आहे. संबंध तसंच ‘स्व’ च तंत्र म्हणजे काय? हे शोधून काढावं असं शिवाजी राजांनी सुद्धा सांगितलं होतं. शिवाजी म्हणजे एक फार मोठा महायोगी होता पण लोकांबरोबर त्यांनी धर्माबद्दल अशी चर्चा नाही केली पण आतून ते फार मोठे योगी होते आणि त्यांनी सांगितलं की आता ‘स्व’ चं तंत्र ओळखलं पाहिजे स्वातंत्र्य झालं, आणि हे ‘स्व’ म्हणजेच आपला आत्मा. आता अंग्रेजी विद्येचं सुद्धा असं आहे की मुद्दाम त्याच्यासाठीच मेडीसीन शिकले कारण मी म्हटलं मला मेडिकलच्या लोकांशी सुद्धा बोलावं लागेल. माझं डोकं फोडतील तर आपण शिकून घेतलेलं बरं. तर त्यात औटोनोमस नर्वस सिस्टिम म्हणून म्हणतात. ऑटो म्हणजे काय स्व पण हा स्व कोण आहे. तुम्ही नुसतं नाव दिलं आहे. ऑटो आपण मोटारीला म्हणतो ऑटोमोबिल, म्हणजे काय त्याच्यात एक ड्रायव्हर असतो, पण आपल्याला तो ड्रायव्हर दिसतो, पण हे न दिसणाऱ्या अशा कुणाला तरी ऑटो म्हणतात. तो कोण ऑटो आहे? तो म्हणजे आपल्या शास्त्रात सांगितलेला आत्मा हा सगळ्यांचा ऑटो आहे आणि त्या ऑटोमुळेच ह्या सर्व संस्था चालत असतात असं एक तऱ्हेने आपण त्यांना समजावून सांगू शकतो. आता सहजयोगाबद्दल आपल्याकडचे लोक जरी अनभिज्ञ असले तरी हे समजू शकतात की जे काही वर आपल्याला दिसतंय, डोळ्यांत जे साक्षात दिसत आहे त्याचं ज्ञान जर सायन्स आहे आणि त्याचं मूळ म्हणजेच योग विद्या आहे तर मग दोन्हीही जाणून घेतलंच पाहिजे. कारण नुसतं जर तुम्हांला झाडंच मिळालं तर हे झाड वाढत वाढत जाऊन कोलमडून पडायचं, कारण त्यांची पाळे मुळे जर नीट पाहिली नाही तर हे कोलमडून पडणारच म्हणूनच आज ही दशा सायन्सच्या संबंध प्रांगणात फार वाढ केलेल्या देशांची झालेली आहे. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल की लंडन सारख्या शहरामध्ये लंडन सारख्या प्रगतीशील शहरामध्ये एका आठवड्यामध्ये दोन मुलं आईबाप मारून टाकतात ठार, म्हणजे इतके पाशवी हे लोक झालेत, इतक्या पशु स्थितीला पोहोचले आहेत की आपल्या आई-वडिलांना सुद्धा मारूनच टाकतात, आजा आणि आजीला सुद्धा लहान-लहान मुलं सात-सात, आठ वर्षांची मुलं मारून टाकतात. मला तर आधी वाटलं होतं युरोपमध्ये असेल पण नंतर मला करेक्ट करून हे सांगितलं की नाही हे लंडनमध्येच आहे. फक्त लंडन सिटीमध्ये होते. ह्या पशु स्थितीला हे लोक कशे पोचले कारण हे यंत्र जे आहे त्याच्यात आत्मा नाही. या यंत्राबरोबर राहून राहून ते यंत्र झाले, त्यांना काही भावना राहिल्या नाहीत. तेव्हा आपण सायन्स कडे फार आघाडीने जातो. त्यानं खायला-प्यायला फार तर होईल, पण हृद्य मात्र दगडाचं होऊन जाईल. तेव्हा अगदी हृदयात बसलेला जो आत्मा आहे त्याला मिळवलं पाहिजे, मग वाट्टेल ते करा. जर आत्मा मिळवला तुम्ही आणि त्याच्यानंतर तुम्ही कोणच्याही क्षेत्रात गेला तरीसुद्धा तुमच्या चारीकडे प्रकाश असा फाकेल. एकीकडे धावत जाणार नाही. सायन्सची प्रगती झाली म्हणजे मनुष्य एकीकडे धावत जातो आणि परत ती सगळी प्रगती घेऊन डोक्यावरच बसते. म्हणजे जर तुम्ही संपूर्ण सायन्स बघितला तो विध्वंसक आहे, संपूर्ण सायन्स हे विध्वंसक शास्त्र आहे बघा आता ज्या ज्या देशांनी आपण नाही नशिबाने एवढे, पण जे देश फार प्रगती करून गेलेले आहेत, त्या देशाच्या सायन्सच्या टोटलीटी मध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या देशांमध्ये सर्व तऱ्हेचे विध्वंसक कार्य चाललेले आहेत. इतके भयंकर आणि इतक्या गहन त्या घाणेरडेपणामध्ये ते गेलेले आहेत की आम्हांला आपल्याला सांगायचीसुद्धा सोय नाही, म्हणजे आपल्या हिंदुस्थानी माणसाच्या डोक्यावरून ते जायचं. इतका मूर्खपणा तिथं चाललेला आहे आणि उलट अधार्मिक अत्यंत अधार्मिक रीतीने राहून हर तऱ्हेचे विचित्र रोग वगैरे त्यांना झालेले आहेत. आता ही जी एक दशा आहे तिकडे आपण वाहवत चाललोय, कारण सायन्स, सायन्स, सायन्स. आपल्याला फॉरेन म्हणजे फार विशेष वाटते. आजच एक बाई मला सांगत होत्या की फोरेनची माती जरी लोकांना सांगितली तरी डोक्याला लावतील आणि हे लोक इथे येतात, आता ह्यांना सर्व कळलेलं आहे. ते फॉरेनचे प्लास्टिक (अस्पष्ट). त्याला म्हणतात ही प्लास्टिक सुबत्ता आहे, प्लास्टिक सुबत्ता नको. नुसते हातमागावरचे कपडे शोधता शोधता आमच्या नाकी नऊ आले. तुमच्या मागे कुठे हातमागावरचे मिळाले नाहीत, शेवटी एका कोपऱ्यात जाऊन मिळाले. तिथले चार कपडे आणले तर केवढया आनंदाने घालून ते फिरले. आणि आपल्याला म्हणजे फोरेनचं असं वाटतं की वा वा वा! खरं म्हणजे त्यांनीच आपल्यापासून सगळं काही शिकून घ्यायचंय, मात्र आपण आपलं आधी मिळवून घेतलं पाहिजे. त्यांनी जे काही मिळवलं सायन्समध्ये ते सुद्धा या देशात घडलं आहे. यज्ञादी वगैरे करून आपण तेव्हा पंचमहातत्वांना जागृती दिली तेव्हाच त्यांना हे कळलं की पंचमहातत्वातनं काय मिळालं, पण एवढं सगळं ज्ञान मिळवून सुद्धा त्यांनी काय काढलेलं आहे तर ऑटोमबॉम्ब, दुसऱ्या तऱ्हेचे बॉम्ब्स हे सगळे विध्वंसक कला त्यांनी हस्तगत केल्या आहेत. माझं असं म्हणणं नाही की आपण अगदी बैलगाडीच्या स्थितीत राहायला पाहिजे. तसं माझं मुळीच म्हणणं नाही पण सायन्स मध्ये जाताना सायन्सचंच सर्व काही आहे असा मात्र डोक्यावर विचार नाही केला पाहिजे. सायन्स तेव्हाच लाभदायी होऊ शकतं जेव्हा तुम्हांला आत्म्याची प्रचिती मिळेल. आता एक साधारण गोष्ट हे (माईक कडे बोट दाखवून) आपल्याला हे आयुध आहे. तुम्ही म्हणाल माताजी जर सायन्स नसतं झालं तर हे कसं आलं असतं, कबूल, ही गोष्ट खरी आहे. जर सायन्स नसतं आलं तर हा मला मिळाला नसता ही गोष्ट आम्हांला कबूल आहे, पण ह्यानेच लोकांचा उद्धार होणार नव्हता, त्याला आम्ही पाहिजे, याने उद्धार होणार आहे का लोकांचा? त्याला आम्ही पाहिजे, तेव्हा हे आम्हाला जरी सहाय्यक असलं तरी मुख्य प्रामुख्याने नाही. आता दुसरी गोष्ट सायन्सचा उपयोग तरी काय हे सुद्धा आपल्याला सांगितलय. यज्ञ वगैरे केल्यामुळे जी पंचमहाभूतं आम्ही जागृत केली होती त्याचाच परिणामस्वरूप आज सायन्स आपल्याला उपलब्ध झाले आहे आणि त्या सायन्स चा उपयोग सुद्धा परमेश्वरी कार्यासाठीच होणार. दुसऱ्या कोणच्याच कार्यासाठी जर तो केला तो विध्वंसक होणार म्हणजे आपले टेलीव्हिजन बघा, आम्ही ह्याला गेलो होतो हॉंगकॉंगला, तिथे एका विशेष कंपनीचा तो टेलीव्हिजन स्वतःचाच प्रोग्राम करत असत आणि इथे आमचे शिष्य झाले आणि त्यांनी सांगितलं माताजी तुम्ही एकदा टेलीव्हिजनवर नुसत्या उभ्या राहा आणि त्याच्यानंतर त्यावेळेला जे लोक बघत होते ते वगैरे आमच्या हातामध्ये थंड थंड अशा चैतन्यलहरी आल्या. नुसत्या टेलीव्हिजनवरनं जो टेलीव्हिजनच्या नुसत्या पटावर आम्ही उभे राहिलो त्यांच्या हातामध्ये अशा थंड थंड लहरी आल्या आणि एक-दोन लोकांना काही रोग होते तेही बरे झाले, म्हणजे ह्या सगळ्या सायन्सच्या गोष्टींचा उपयोग परमेश्वरी कार्यासाठीच व्हायला पाहिजे, कारण ही परमेश्वरानेच दिलेली पंचमहाभूतं आहेत आणि त्यांचा उपयोग जर परमेश्वरी कार्यासाठी नाही केला तर तो विध्वंसक होईल ही मोठी तत्वाची गोष्ट आहे ती समजून ठेवली पाहिजे. म्हणजे ज्या तत्वासाठी ह्या मुळातून हे झाड काढलेलं आहे जर तेच मूळ त्यांनी तयार नाही केलं,  समजा जर मुळातून निघालेली ही झाडं त्याच्यात जर बी तयार नाही झाले आणि राक्षस तयार झाले तर असल्या झाडाचा काय उपयोग आहे? परत त्याच्यातून मुळं निघाली पाहिजेत. अशातऱ्हेचे बी त्याच्यात तयार झाले पाहिजेत तरच त्या झाडाला काहीतरी अर्थ आहे आणि तसच मानवाचं सुद्धा आहे. ह्या एका शेवटल्या स्थितीमध्ये आज मनुष्य आला आहे. त्या देशामध्ये लोकांनी बघितले की आता कुठं जातो आहे कोलमडून आम्ही कुठे पडणार पडला आणि ते बघूनच ते दचकून बसले आहेत आणि त्यांना वाटतं कोणचा शॉक आमच्यावरती येणार आहे आणि आपण अजून त्या परिस्थितीत पोचले नाहीत. म्हणून आपल्याला केवढं मोठं आहे त्याचं, तरीसुद्धा आपल्या भारत वर्षांत विशेषतः महाराष्ट्रात त्याला महाराष्ट्र म्हटलंय ते अनादिच आहे. ही गोष्ट खरी अजूनही ऐंशी टक्के लोकांचं परमेश्वरावर अत्यंत प्रेम आहे. भाविक लोकं. दहा पर्सेंट लोक त्यातले उपटसुंभ आहेत. देवाच्या नावावर पैशे कमावतात. हे धंदे कर ते धंदे कर, काही लिखाण करून टाक, खोटी कामं करा. कुणी गुरु मेला म्हणजे त्याचे खूप काही भांडणं चालतात. पैशावरुन सगळा काही पैशापायी (अस्पष्ट) परमेश्वराच्या नावावर पैसा हे महान पातक आहे आणि अशी महान पातकं केलेली लोकं मग रसातळाला जातात, पण जरी त्यातले दहा पर्सेंट जरी विरोधक असले तरी परमेश्वराला जरी नास्तिक असले तरी ते तरी नास्तिकच आहेत. कारण नास्तिकता सुद्धा अशामुळे आलेली आहे, कारण त्यांना परमेश्वराचा अजून बोधच झालेला नाही, संबोध झालेला आहे. उगीचंच वेडयासारखे आमचे आईवडील उगीचंच कायतरी देवळात काय जातात, घंटा काय वाजवतात आणि हे काय करतात. बामणाला पैशे देतात, नुसते पैशे लुटतात, ऐकायला तयार नाहीत अशे गुरु करून ठेवलेले आहेत. सगळे खोटे गुरु आहेत असा एक बौद्धिक विचार, कॉलेजातील गेलेली मुले म्हणा, किंवा शिक्षक म्हणा, किंवा बुद्धिवादी लोक ह्याच्या डोक्यात येतो. तो ही सहजच बरोबर आहे, कारण खरोखरच धर्माची दुर्गती आपल्या देशामध्ये नाही तर अनेक देशांमध्ये झाली आहे. प्रत्येक धर्मात झाली आहे, त्याबद्दल शंकाच नाही, कारण सर्व तऱ्हेचा गोंधळ, सर्व तऱ्हेचा व्यभिचार आणि सर्व तऱ्हेची (अस्पष्ट) भ्रष्टाचार हा धर्मात सर्वांत जास्त आहे. त्यामुळे लोकांना असं वाटतं, आम्ही आजपर्यंत आम्ही टाळ कुटून कुटून ‘पांडुरंग पांडुरंग’ केलं तरी माताजी आमच्या नशिबी परमेश्वर का नाही? काही लोक मला विचारतात माताजी आम्ही रोज पारायणं करतो दत्तात्रयाची पण आमची पोटंच खराब झाली आहेत, म्हणजे दत्तात्रयाचं स्थान आहे पोट आणि ते कसं खराब झालं. बरोबर आता ही समजा मशीन आहे किंवा तुमचा टेलिफोन आहे याचं जर कनेक्शनच झालं नाही तर तुम्ही टेलिफोन फिरवत सुटले तर टेलिफोन तुमचा खराब होईल की नाही त्याच्यात देवाचा काय दोष आहे. देवाला दोष लावणं बरोबर नाही. जर तुमचा जर योगच झाला नाही तर क्षेम कसा होणार? कृष्णानं स्पष्टच सांगितलंय ‘योगक्षेमं वहाम्यहम’ आधी योग व्हायला पाहिजे मग क्षेम होणार. संबंध कृष्णाच्या गीतेमध्ये जे वर्णन करून सांगितलंय ते जर मनुष्याने पार झाल्याशिवाय बघितलं तेव्हा साक्षात्कार झाल्याशिवाय बघितलं तर अगदी उलटं दिसतं. कारण कृष्ण हे मोठे राजकारणी परमेश्वरी तत्व होतं. फार मोठे राजकारणी परमेश्वरी तत्व होते आणि त्यांनी असं बघितलं की अर्जुनाच्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही, त्यांनी सांगितलं की त्यांनी अर्जुनाला सांगितलं अर्जुनाला स्पष्ट सांगितलं की, बाबा हे तुझे नातलग बितलग जेवढे तुला दिसतायत, तुला उपरति आलेली आहे हे सर्व काही खोटं आहे. हे सर्व आधीच मेलेले आहेत तेव्हा तू मार. त्याच्यात काही हरकत नाही, तर पुष्कळांचा समज कृष्णाने हिंसा विद्या शिकवली,  पुष्कळांचं असं आहे कृष्णाच्या विरोधात कृष्णानं हिंसा शिकवली. अर्जुनाला आता असं आहे की खरोखरच मनुष्य गेलेला आहे किंवा नाही त्याची जडस्थिती काय आहे आणि आत्मा त्याचा अविनाशी आहे की नाही ते जेव्हा तुम्ही सूक्ष्मरूपाने या मुळात उतरणार नाही तोपर्यंत समजावून सांगणं म्हणजे असंच आहे की एखादया आंधळ्या माणसाला सांगायचं की हा रंग कोणचा, तो रंग कोणचा? दुसरी म्हणजे कृष्णाच्या बाबतीमध्ये समज आपला जितका आहे तितका (अस्पष्ट) त्यांनी सुरुवातीलाच सांगितलंय तू ज्ञानयोग ज्ञानाचा अर्थ आपल्याला असं वाटतं की पुस्तकी योग, किंवा पुस्तकात वाचणे. कृष्ण कधी शाळेत जाऊन त्याने पुस्तके वाचली असतील की नाही, थोडे दिवस गुरु कडे होते पण युनिवर्सिटीला गेलेले वगैरे आपण काही ऐकलेले नाही, आणि कोणचेही संत साधू युनिव्हर्सिटीला गेलेले नाहीत. तेव्हा ज्ञान चा अर्थ जो आहे तो आपण अगदी चूक समजतो. ज्ञानाचा अर्थ असा आहे की आपल्या चित्तामध्ये आत्म्याचे दर्शन होणं हेच खरं ज्ञान आहे. त्यात परंतु जेवढं तुमचं ज्ञान आहे, ते सगळं बुद्धीचा खेळ आहे. संबंध बुद्धीचा खेळ म्हणजे आता आपल्याला एक मनुष्य समोर येऊन उभा राहतो, तो मनुष्य खरा आहे का खोटा आहे ते सांगता येईल का? नाही, विचारते, तुमच्या बुद्धीने तुम्ही हे सांगू शकता का? एखादा जर दगड ठेवलेला असतो जमिनीतनं तो निघालेला कोणी म्हणतो हा स्वयंभू आहे, कोणी म्हणतो नाही. तुम्ही सांगू शकता का? आहे की नाही आहे? कशी ओळख करायची त्याची, तुम्ही सांगू शकता का, दुसऱ्या माणसाला कोणचा रोग आहे? कोणचा त्रास आहे? नुसते हात अशे करून, म्हणजे काय की तुम्हांला जे ज्ञान आहे ते फक्त डोक्याने मिळालेले ज्ञान आहे. डोक्याच्या पलिकडचं नाहीय आणि डोकं हे सिमित आहे, असिमातलं नाहीय तेव्हा जोपर्यंत तुमच्यामध्ये चैतन्य शक्ती वाहते, तुम्ही कोणत्या गोष्टीचं प्रमाण म्हणजे अंदाजे सांगणार? आता आपलं डायग्नोसीस सुद्धा करायचं झालं म्हणजे माणसाचा अर्धा जीव काढल्यानंतर मग सरळ सांगतात की बुवा तू आता मरणार असं सर्टिफिकेट नंतर द्यायचं, बाबा तू आता मरणार हे सर्टिफिकेट देण्यासाठी त्याचं डायग्नोसीस करत बसतात. पण सहजयोगात लगेच मनुष्य सांगू शकतो की तुला कोणचा रोग आहे अगदी लहान मुलगासुद्धा सांगू शकतो. इतकं हे सोपं काम झालंय, कारण हे तत्वावरचं काम आहे. जर तुम्ही तत्वावर उतरलात तर तुम्ही बरोबर सांगू शकता की कोणाला कोणचा त्रास आहे, आणि हे आत्मसाक्षात्काराचं कार्य आता अत्यंत जोरानं आता वाढत आहे. इतर ठिकाणी फार झालेलं आहे फक्त ह्या नाशकात वगैरे या बाजूला इतके वाढलेलं नाहीय. पण तरी आपण नाशकाला बसलोय. नाशिक हे फार पवित्र स्थान आहे. गोदावरीच्या किनाऱ्यावर सगळीकडे प्रसिद्ध आहे, पण त्याची पवित्रता आता हळू हळू कमी होत चाललीय, कारण देवळातून सगळा घाणेरडा प्रकार चाललेला आपण बघतोच आहोत. दुसरं म्हणजे असं की लोकांचं सुद्धा वागणं त्या पवित्रतेला तुम्ही तीर्थस्थानी आहात तसं गृहित धरून राहत नाही. आता परवाच एक गृहस्थ मला म्हणाले, ते देवीच्या देवळात गेले होते. सप्तशृंगी ही जागृत आहे आणि तिथे गुरुजी बसलेत तर त्यांनी त्याला तंबाखू म्हणून आशीर्वाद दिला. अशा गुरुजींना काढून फेका म्हणून मागेच मी सांगून ठेवलेलं होतं, पण तिथे बसलेले आहेत व्यवस्थित गुरुजी कारण शाळा बिळा चालवतात. अशे गुरुजी जे तंबाखूचे जर तुम्हांला देतात प्रसाद अशा व्यर्थ मनुष्याला तिथे बसवून त्याला पैशे देत बसण्यापेक्षा तुम्ही घरी बसून जर देवधर्म केलात तर तो बरा फळणार आहे. तेव्हा प्रत्येक देवाच्या ठिकाणी जिथे काही स्वयंभू आलेला आहे तिथे बरोबर अशे लोक जाऊन बसलेत, तांत्रिक नाहीतर खोटे लोक पैसे भरवणारे असे बसल्यामुळे तिथून सुद्धा देव उठणार. देवाला सुद्धा कंटाळा यायचा या गोष्टीचा की हे काय मूर्खपणा चाललेला आहे, आणि त्यामुळे जी अधोगती आता आपल्या सर्व तीर्थस्थानांना येत आहे ती आता यापुढे येणार नाही. जर आपण सर्व साक्षात्कारी झालो कारण साक्षात्कारी माणसाला पहिला गुण येतो म्हणजे तो काय सर्व वस्तू शुद्ध, निर्मल करत जातो. आपोआप शुद्ध आणि निर्मल होत जातात वस्तू. पहिल्यांदा त्याचं हृद्य स्नेहमय होतं. सच्चिदानंदाची ही जी शक्ती आहे त्यातले हे पहिल्यांदा सत्य काय ते कळतं. इथे बसल्या बसल्या सुद्धा जर तुम्हांला कुणाच्याबद्दल विचार करायचा असेल तर हा मनुष्य कसा आहे, लगेच तुमच्या बोटांवरती ह्या सात चक्रांवरती आणि इथे पाच, सहा, सात असं (तळहाताकडे दाखवून) (चार्ट च्या दिशेने पाहून) ते असं ठेवलेलं आहे, आपल्या  समोर आपण बघा ते सात चक्रांचे असे हातावरसुद्धा त्यांचे परिणाम दिसून येतात, म्हणजे आपण जर दहा मुलं घेतली साक्षात्कारी आहेत. आमच्याकडे पुष्कळ अशी मुलं जन्माला येतात जी साक्षात्कारी आहेत, पण तुम्हांला कसं कळणार आपला मुलगा साक्षात्कारी आहे की नाही. कारण तुम्ही स्वतः साक्षात्कारी नसल्यामुळे त्याच्यातनं चैतन्य लहरी येतात की नाही कळत नाही तर या सात बोटांमधून लगेच आपण हात केल्यावर लगेच कळून येईल की हा हात इथे बोट चमका मारतं, या बोटाला चमका मारतं आणि हे बोट धरलेलं आहे, म्हणजे काहीतरी ह्या माणसाने अशी गोष्ट केली आहे. जी अनाधिकार चेष्टा आहे, धर्माच्या नावावर एखादा मनुष्य धर्माबद्दल मुळीच परमेश्वराकडून अधिकार मिळालेला नाही. अशा माणसांच्या समोर जाऊन जर तुम्ही डोकं टेकलं तर हे दोन चक्र धरणार आणि असा मनुष्य हळूहळू भ्रमित होऊन वेडा होईल. परवा एक गृहस्थ आमच्याकडे आले. ते त्यांना मी सांगितलं, एक वारा आलेला मनुष्य असायचा. वारं यायचं म्हणजे ही एक आणखी भ्रामक कल्पना आहे एक तर सायन्स च्या भ्रामक कल्पना आणि दुसऱ्या म्हणजे भाविक लोकांच्या अशा दोन्हीच्या कचाट्यात आम्ही सापडलेलो आहो, तर अशी की, कुणाच्या अंगात वारं आलं म्हणजे देव आला, आता जरा डोकं थोडं त्या ठिकाणी लावायला पाहिजे, अहो परमेश्वर कुणाच्या अंगात यायला काही ताकद पाहिजे की नाही  त्या माणसाला. एक अक्कल पाहिजे. वाट्टेल त्या मोलकरणीच्या अंगात सुद्धा देवी येऊ लागल्या. प्रत्येकाच्या अंगात येऊ लागल्या, ही सगळी भूतं आहेत. आणि त्या माणसाला (अस्पष्ट) असे गुरु शोधत (अस्पष्ट) थोडं ज्यांच्या अंगात येतं ते तुम्हांला नुकसान करेल की, त्याने ऐकले नाही, आता परवा मी तिथे गेले तर ते म्हणाले, माताजी माझे डोळे गेले. डोळे उघडे आहेत संबंध मागचा भाग धरल्यामुळे स्वाधिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र मागं धरल्यामुळे अगदी आंधळा झाला आता कॅन्सरला फार लोक घाबरतात आणि कॅन्सरचा रोग सुद्धा अनाधिकार चेष्टेमुळे होतो. कोणच्या प्रकारची अनाधिकार चेष्टा केली, धर्माच्या बाबतीत तर कॅन्सरचा  रोग हमखास होतो, ही परमेश्वराची शिक्षा आहे, कर्करोग ज्याला म्हणतात. कॅन्सर हा जो मनुष्य धर्माच्या बाबतीमध्ये अनाधिकार चेष्टा करतो, त्याला हा रोग केव्हाही होऊ शकतो, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आता मी तुम्हांला स्पष्टपणाने अशासाठी सांगते कारण मी आई आहे. तुम्हांला वाईट वाटो अथवा बरं वाटो मला काही तुमच्याकडून वोट्स घ्यायचे नाहीत की मी तुम्हांला प्रसन्न करायला आली नाही. तुम्हांला जे खरंय ते सांगायला आले. अशे जे लोक कार्य करत असतात. अनाधिकार चेष्टा परमेश्वराच्या विरोधात करायची अशा लोकांना हा रोग फार लवकर होतो. आता रुस्तमच आपल्याला सांगत होते, ही गोष्ट खरी आहे, कारण त्यांनी स्वतः पण पाहिलंय, आम्ही बरेच कॅन्सरचे रोग बरे केलेत. याबद्दल शंकाच नाही आता अशा पुष्कळ लोकांना गरीब, श्रीमंत, हा रोग गरिबांना कमी होतो, श्रीमंतांना जास्त होतो. श्रीमंताचं तुम्हांला माहीतच आहे, की कुठीतरी त्यांना असं वाटत असतं की आपण हा पैसा कमावतोय, कुठंतरी धर्मकारणी लावायचा, मग मुंग्या मिळाल्या तर त्यांना देत बसायचं आता त्या मुंग्यांना मी रीयलायजेशन देणार आहे? मुंग्यांना कशे दयायचे मग ते नाही तर फॉरेनहून त्यांनी पुष्कळसे भिकारी बोलावले नगरला मी गेले तर ते माझ्याशी येऊन भांडायला लागले सर्वजण, माताजी हे फोरेनेर्स इथे येतात आमच्याकडे भीक मागायला येतात. ‘हरे रामा, हरे रामा’ करत आमच्याजवळ भीक मागतायत. आता आम्ही थोडे दिवस तरी पोसलं, लाड केले, आता मात्र कंटाळा आला. श्री माताजी तर हे कुठनं आले, मी म्हटलं की असं आहे आपल्याकडे श्रीमंत लोकांना अक्कल यायला पाहिजे आता भुनग्यांच्या ऐवजी  मी तरी काय करू आता तुम्ही पाळा, सोपं नाही तर काही करा पण एक अकलेची गोष्ट अशी आहे की कोणत्या माणसाला दीक्षा देत बसायची. मग तो फोरेनेर असला तर फोरेनर दीक्षा. तेच आपलं स्वतःचं महत्त्व करून घ्यायचं. अशा रीतीने आपण आपल्या धर्माचं काय काय वाटोळे करून ठेवलंय आणि धर्म हा शुद्ध निर्मल आहे अत्यंत अल्हाददायी आणि आपल्यात संतुलन निर्माण करणारा असा महान पवित्र परमेश्वराचा स्त्रोत आहे ते सोडून काहीतरी भलतंच घेऊन धर्म धरून बसायचं याला धर्म मानायचा, त्याला धर्म मानायचा हे मानवानं सगळं आपल्या बुद्धीने काढलेलं आहे आणि धर्म हा बुद्धीच्या पलीकडचा आहे मग दुसरे एखादे समाजवादी माझ्या डोक्यावर येऊन बसणार. माताजी हा समाजवाद असा आहे, समाजवाद तसा आहे, समाजवादाचं असं आहे, हे वादतच बसले माझ्याशी. तुम्ही गरिबांची सेवा करा, अहो गरीब श्रीमंत आम्हांला दिसतंच नाहीत हे तुम्ही केलेत. देवाने काही गरीब-श्रीमंत बनवले नाहीत. कोणी आला, तरी पाण्याचं असं आहे, जिथे खळगा दिसला भरतंच जाणार, पुढे जाणारच नाही पाणी, तिथेच जमून राहणार (अस्पष्ट) आम्हांला गरीब-श्रीमंत काय दिसत नाही, सगळे आम्हांला प्रिय आहेत. आम्ही सगळ्याचं भलं करतो. पण एवढाच फरक आहे तुमच्यात- आमच्यात. तुम्ही नुसतं समाजवाद बोलता आमचा कार्यान्वित होतो. हे सगळं काही तुमचं नुसतं बोलण्याचे धंदे आहेत आणि हे शब्दजालामध्ये पकडून स्वतःला, स्वतःला तर तुम्ही नुकसानात घालणारच आहात पण दुसऱ्यांनाही घालणार आहात, कारण शब्दजाल आहे. तुमच्या हातून आज कुणाचं काही भलं झालंय का? पहिल्यांदा प्रश्न आहे- तुम्ही कोणाचं भलं केलंय का? असा एक प्रश्न स्वतःला विचारावा, जसा ख्रिस्ताने एकदा एका वेश्येवरती लोकांनी खूप दगड मारले, तेव्हा जाऊन तो उभा राहिला. त्याचा वेश्येशी काही संबंध नाही, काही नाही, मध्येच जाऊन उभा राहिला. तुमच्यातला ज्यांनी कोणी पाप नाही केलं त्यांनी हिच्या अंगावर दगड धोंडा घालावा नाहीतर माझ्यावर मारावा. तेव्हा सगळे चुप झाले. तशी स्थिती इथे आहे. तुम्ही कोणाचं भलं केलं आहे काय? उगीचंच नुसते हे वाद ते वाद अशे घालून लोकांचं नुसतं डोकं फिरवण्या पलीकडे काही झालेले नाही. तेव्हा या राजकारणाला सुद्धा काही अर्थ नाही. आता वादाचं जर घेतलं तर लोकांचं असं म्हणणं आहे की पुंजीवाद, (अस्पष्ट) सर्व पुंजी जर माझ्याजवळ असली (अस्पष्ट) मी पुंजीवादी पण सगळ्यात मोठी कॉमुनिस्ट सुद्धा मीच आहे, कारण दिल्याशिवाय चैन येत नाही. सगळं वाटल्याशिवाय चैन येत नाही असा पुंजीवादी तुम्ही सहजयोगानंतर व्हा. मग हे जे राजकारण वगैरे तुमचे आहे. मार्क्सवाद अमके वाद, तमके वाद. मला तर वाटतं, नुसता वाद हा शब्द सुद्धा नुसत्या डोक्यातून चालवलेला लढयाचा आहे, याच्यामध्ये कार्यान्वित म्हणजे काहीच नाही. कॉमुनिस्ट पाहिले तरी काय कार्यान्वित आहे? एक बाबाजी आले त्यांनी सांगितलं ते असं करू नका, तसं करू नका, इथं करू नका. इथली गरिबी आहे. इथे म्हणे गरीब लोक वाळू खातात, आता कुठे पहिले देवाला ठाऊक आणि स्वतः मात्र इम्पोर्टेड गाडीतून गेले. दुसऱ्यांच्या दमावर हे असले जे दुटप्पी तऱ्हेचे वर्तन आहे किंवा हा जो एक आपण म्हणू की भोंदूपणा आहे किंवा जे ढोंग रचलेलं आहे, देवाच्या नावानं हे सगळं बुद्धीवादामुळे, कारण ज्या माणसांना बुद्धीवरती पेलायचं आहे तो लेक्चर नुसते देऊन देऊन सुद्धा देवाला उडवून लावू शकतो. तेव्हा देव हा आहे किंवा नाही ह्याची सिद्धता केली आहे ते आधी जाणावं. आपण त्या परमेश्वरासमोर कोण आहोत अहो, जो एका फुलातनं फळ काढत असतो. अशा हजारो, करोडो अशा जिवंत कार्याला जो उन्नत आहे, त्याच्यासमोर आम्ही होतो का आम्ही तरी एका फुलाचं तरी फळ करू शकतो का? हा विचार करा. एवढे मोठे सायंटिस्ट  बसतात. मी म्हटलं तुम्ही एक तरी जिवंत कार्य करून दाखवा, पण कुंडलिनी जागरण हे मात्र जिवंत कार्य आहे, कारण तुमच्या ज्या त्रिकोणाकार अस्थिमध्ये जी कुंडलिनी बसलेली आहे, ती साक्षात जागृत होते. तिचे स्पंदन दिसतं. तिचं चढणं दिसतं, तिचं ‘शून्य शिखरपर अनहद बाजे’ जे म्हटलेलं आहे ते बरोबर इथे तुम्हांला वाजतं. त्याच्यानंतर त्याचा प्रसाद जो हातातनं थंड थंड लहरी वाहू लागतात. मग हेच लोक लोकांना बरं करतात. बरं करणं वगैरे हे सगळं लौकिक आहे. लोकांना बरं करणं ‘योगक्षेम वहाम्यहम’ पुष्कळांची आर्थिक परिस्थिती फार दुरुस्त होते. आता हे डॉक्टर रुस्तम ह्यांचा तर चौपटीने, पाचपटीने पगार झालेला आहे. नंतर एक सायंटिस्ट आले होते, त्यांचा एक छोटासा हा होता थिसीस होता त्याच्यामध्ये दारू का पिऊ नये असं त्यांनी मला विचारलं, ते म्हणजे लिव्हर वर लिहित होते तर मी त्यांना सायंटिफिक भाषेत सांगितलं की (अस्पष्ट) कसं कसं रुपांतर होतं. या दारूमुळे आणि दारूमध्ये काय असतं त्यांनी कसं होतं तर त्यांनी थक्कच पडले आणि त्यांचा पी. एच. डी. जो तीस वर्षांपासून पास होत नव्हता, म्हातारे होऊन गेले बिचारे. तो पास झाला. तत्ववाल्यांनी सर्व गोष्टी समजतात की कुठे काय बिघडलंय, कुठे काय पण सहजयोगामध्ये आम्ही असे सांगत नाही की तुम्ही हे करू नका, ते करू नका, हे खाऊ नका, ते खाऊ नका. एकदा सहजयोगात या म्हणजे आपोआप सगळं सुटतं  कारण जेव्हा तुम्ही समर्थ व्हाल तेव्हा तुमच्यात शक्ती येईल आणि जेव्हा तुमच्यामधून अमृत वाहू लागेल तेव्हा अशा घाणेरड्या गोष्टींच्याकडे मनुष्य कशाला धावेल आणि जेव्हा तुम्ही स्वतः स्वतंत्र व्हाल तेव्हा त्या स्वातंत्र्यात तुम्ही कोणाची गुलामी करणार नाही आणि जो मनुष्य स्वतःची गुलामी करत नाही तो दुसऱ्याची कशाला गुलामी करून घेईल. तेव्हा एक नवीनच तऱ्हेचा मानव तयार होतो त्याला आपण महामानव असं म्हणतो. महायोगामध्ये महामानव तयार होतात, अशेच आपल्यामध्ये अनेक आहेत. आपल्या देशात हजारोंनी लोकं आहेत. खटकन पार होतात. हजारो लोकं, एका क्षणामध्ये लोकं पार होताना मी पाहिलेलं आहे पण ह्या लोकांसाठी मात्र फार मेहनत करावी लागते पण ह्याच्यातला एक एक मनुष्यसुद्धा आपल्या हजारो लोकांच्याबरोबर बसतो कारण तो मेहनत करून प्रवीण होतो, हुशार होतो, तो शिकून घेतो. नुसता वादविवाद घालत बसत नाही किंवा आळस करत नाही, त्याबद्दल मेहनत करतो, मेहनत करून जिंकून त्याच्यावर बसतो. आता डॉक्टर संघवीसुद्धा जर सायंटिस्ट नसते तर इतक्या उच्चप्रतीचे मला वाटतं कधी कधी सहजयोगी झाले नसते. कारण त्यांनी पाहिलं की हा खरोखर सायन्स आहे त्याच्या संबंध तऱ्हेने मेहनत करून हे कमावलं पण आपल्या देशातले पुष्कळसे भाविक लोकसुद्धा राहुरी जिल्ह्यातले विशेष करून हजारो लोक पार झाले. त्याचं आयुष्य बदललं त्यांचे रोग गेले, त्यांची व्यसनं सुटली, व्याधी गेल्या, व्यसनाधीन झालेले लोक आता मुक्त होऊन आता आणि व्यवस्थित असा सहजयोग करतात. परवा एका बैलगाडीतून मी जात होते. बैलगाडीला हाकणारा एक सहजयोगीच आणि तो बोलायला लागला तर म्हटलं तर साक्षात कबीर उभे आहेत की काय आणि त्याने कधी शाळा बघितलेली नाही, कबीरासारखे बोलत होते, आणि मी ऐकून अगदी आश्चर्यचकित झाले, म्हणे माताजी हे सगळं सहजयोगात कळतं नाही का? आणि मला आश्चर्य वाटले हा मनुष्य एक सर्वसाधारण दिसणारा इतका मोठा पोचलेला विद्वान कसा? जो कोणी साधारण मनुष्य समजू सुद्धा शकणार नाही, अशारितीने अत्यंत उच्चतऱ्हेचे तत्वज्ञान तुम्हांला सांगत होता लोकांच्याबद्दल मला फार आनंद झाला. एक सर्वसाधारण बैलगाडी हाकणारा मनुष्य एका गावात राहणारा त्याला एवढं ज्ञान मिळालं म्हणजे सगळं ज्ञान आपल्या डोक्यातच आहे. फक्त तिथे प्रकाश जायला पाहिजे. तो प्रकाश मिळायला पाहिजे. तेव्हा आता जेवायला मिळायचं असलं तर आपल्याला आमंत्रण द्यावं लागतं. आपल्या महाराष्ट्रात विशेष करून दहा दहा आमंत्रणं दयावी लागतात, नाहीतर लोकं येत नाहीत पायघडया घातल्याशिवाय. बरं त्याच्यानंतर जर तुम्हांला लग्नाला बोलवायचं तर तुम्हांला अक्षता वगैरे वाटाव्या लागतात. नाहीतर लोकं म्हणतात आम्ही येत नाही, आम्हांला अक्षता मिळाल्या नाहीत. आता सहजयोगासाठी मात्र हात जोडून विनंती आहे, सगळ्यांना की कृपा करून नम्रपणे स्वतःचं जे काही आहे ते घेऊन जा कारण आम्हांला काही देणं-घेणं नाहीय. तुमचा दिवा आहे, फक्त तो पेटवायचा आहे, एक पेटलेला दिवा अनेक दिवे पेटवू शकतो. आपल्यात जसे ‘ज्योत से ज्योत मिलाओ’ तशातली स्थिती, त्याला काही तुम्हांला मला द्यायचं नाही, मला तुमच्याकडून काही घ्यायचं नाही. फक्त तुमच्यात हा दिवा आहे. आत्मसाक्षात्कार करायचं कार्य हे मला साध्य आहे ते कसं झालं काय झालं, ते आता सांगण्यासारखं नाहीय. पण तुम्ही नंतर बघाल तर तुम्हांला कळेल की कसं झालं? फक्त तेवढंच मला येतं उद्या जर हे (माईक कडे बोट दाखवून) तुटलं तर मला नीट करता येत नाही. मला बँकेतले पैसे कसे काढायचे ते येत नाही. मला काहीच येत नाही, जगातलं काम. तेव्हा एवढं एक काम येतं तेवढं त्याच्यासाठी माताजींनीच कशाला करायचं, परवा एक गृहस्थ म्हणाले, माताजी तुमचाच फोटो कशाला, म्हटलं तुमचा ठेवा (हास्य). तुम्हीच कशाला? तुम्ही बसा, मला बरं, माझा नवरा फार चांगला आहे, माझी मुलं-बाळं फार चांगली आहेत मी संसारात रमून आहे. तुमच्यासाठी धडपडत इतकी गावातनं भटकते, सगळं काही करते, तुम्ही जर करू शकला तर उत्तम मी तुम्हांला हार घालते, बसा म्हटलं तुम्हांला माताजी म्हणू या. तुम्ही बसा. पण ते जमण्यासारखं आहे का? म्हणजे असा मनुष्य आपल्या लक्षातच येत नाही. जो मनुष्य आंतरिक प्रेमाने प्रेमासाठी प्रेमाचं कार्य करतो. हे आपल्या डोक्यातच येऊ शकत नाही कारण आपण तशे नाही आहोत तेव्हा तसं नाही, तशेही लोक पुष्कळ झालेत आणि आहेत आपल्यासमोर होते. आजकालच्या काळात कमी असतील. आज-कालच्या काळातही पुष्कळसे साधू-संत आहेत, पण दरीखोऱ्यात लपून बसले आहेत. मला सांगतात माताजी बारा वर्षांनंतर आम्ही येऊ. माताजी आमचे तर हात-पाय मोडलेत लोकांनी. आपण त्यांचा छळच करत आहोत. अशा सर्व लोकांचा आपण छळच केलेला आहे. जे झालं ते झालं आता विसरून जा. पण आता मात्र नाविन्यानं हे जाणलं पाहिजे. जर आम्हांला हे मिळालं तर आम्ही ओळखू कोण संत आणि कोण असंत.  ह्याबद्दल अनेक तऱ्हेने पूर्वीसुद्धा भाकितं झालेली आहेत. किंवा काहीही झालेलं असलं तरीसुद्धा, जो पर्यंत तुम्हांला साक्षात्कार होत नाही, जोपर्यंत त्याची साक्ष तुम्हांला पटत नाही, तोपर्यंत हे सर्व काही व्यर्थ आहे. तेव्हा तुम्ही हे कृपा करून घ्या. हे वरदान तुमच्यातच आहे, तुमचंच आहे, तुमचीच संपदा आहे ती तुम्ही मिळवून घ्या. एवढं मात्र मी फार आर्जवानं तुम्हांला मागते. 

      आजचा पहिलाच दिवस आहे म्हणून एक दोन- चार प्रश्न विचारा, पण उगीचंच कोणचे वाद वगैरे घेऊन तुम्ही ह्या पुस्तकात असं लिहिलंय, आमचे गुरुजी असे म्हणाले असं करून विचारू नका. कारण जर ते म्हणाले असतील तर त्यांना म्हणावं तुम्हीच आत्मसाक्षात्कार दया, मी असं जर म्हणाले आम्ही आत्मसाक्षात्कार देतो म्हणजे असे गुरु कुणाला धरून बसू नका. जे काही विचारायचं असेल तेच तुमच्याबद्दल किंवा समाजाबद्दल किंवा काहीतरी प्रश्न सहजयोगाबद्दलच विचारलेला बरा, प्रश्न विचारून घ्या असला तर….

       यांचा प्रश्न असा आहे की जर हिंदीमध्ये बिना पात्रता के कुंडलिनी का जागरण हो तो नुकसान करेगा या होगी नही?

       ये आपको सोचने की बात नही है, हमको सोचने की बात है समझ लीजिए, आप किसी स्कूल में गए या कोलेज में गए तो वह प्रिन्सिपल साहब सोचेंगे न, आपको तो यही सोचना चाहिए की मेरी पात्रता है क्योंकि माँ कहती हैं, और माँ की शक्ति जब है तो वह पात्रता दे सकती है तो देगी भी और उसके प्यार में शक्ति हैं तो कुंडलिनी भी जागृत करेगी, तो विश्वास से बैठना चाहिए| अपने लिए अपने प्रति आस्था रखनी चाहिए| अपने प्रति आस्था स्वतःबद्दल विश्वास असायला पाहिजे. स्वतःबद्दल आस्था असायला पाहिजे. जर आपल्याबद्दल आस्था नाही ठेवली माणसाने तर मात्र कठीण जातं. स्वतःबद्दल न्यूनत्वाची भावना आपण पुष्कळ शिकलो. मी पतित, तुम्ही अमुक, तमुक असं काही करायचं नाही. परमेश्वर हा दयेचा सागर, प्रेमाचा सागर, क्षमेचा सागर असा फार मोठा आपला फार मोठा बाप आहे. तो सर्व समर्थ आहे, जर त्याची इच्छा असली तरी काहीही होऊ शकतं. असा पूर्ण निर्धार करून बसायचं आणि स्वतः बद्दल काही आम्ही अपात्री वगैरे असा काही विचार करू नका. तो आम्ही करू, तो तुम्हांला करायचा नाही. तुम्ही आपलं आरामात बसा, होईलच कुंडलिनी जागरण, दुसरं असं की सहजयोगात आजपर्यंत आम्ही कुंडलिनीचा त्रास झालेला पाहिलेलं नाही. त्याला कारण असे की, आम्ही जाणकार आहोत. जे जाणकार नसतात (माईककडे दाखवून) ह्यालाच जर आम्हांला ठीक करायला सांगितलं की आम्हांला शॉक बसेल कारण आम्हांला माहिती नाही ना त्याच्यातलं काही, ज्याला माहिती आहे ज्याला हे कार्य माहिती आहे आणि जो अधिकारी आहे त्याला काहीच त्रास होत नाही आणि तो दुसऱ्यांना त्रास होऊ देत नाही. दुसरं हा म्हणजे तुमचा पुनर्जन्म आहे. तुमचा जन्म झाला तेव्हा तुमच्या आईनेच कष्ट उचलले. तुम्ही काय उचललेत का? तिने तुमची पात्रता बघितली की नाही की जन्माच्या आधी कशी होती, पात्र आहेत की नाहीत तिनं आपल्याला जन्म दिला, असह्य वेदना सहन करून ती मुलांना जन्म देऊ शकते कारण ती धात्री आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही आईच्या स्वरुपात तुमच्या समोर उभे आहोत आणि आईच्या स्वरुपात काहीही मनुष्य कार्य करू शकतो. मग आता काय तुमचं? बोला काय?

प्रश्न- मोह आणि संमोहन याच्यामध्ये काही फरक आहे का?

     पुष्कळ आहे बेटा, सांगते याचं उत्तर, बसा एक मिनिट

मोह आणि आत्मसंमोहन याच्यात फार फरक आहे. आत्मसंमोहन म्हणजे एक झूठी गोष्ट आहे. अगदी खोटं आहे ते. त्याच्यात आत्म संमोहनात मनुष्य आपल्याला समजतो की मी फार मोठा झालो, मला हे फार मिळालं, ते मिळालं, मी आत्मा आहे आणि मी ओंकार आहे. हे तर असं झालं की उदया मी म्हटलं इंदिराजी आहे, म्हणजे कलेक्टरसाहेब मला अरेस्ट करतील की नाही. स्वतःबद्दल खोटया कल्पना करून घेणं याला आत्म संमोहन म्हणतात. पण आत्म्याचा आपल्यातनं प्रकाश पडणं ही खरी गोष्ट आहे. त्याचं ते कार्यान्वित आहे. त्याची प्रत्येक गोष्टीची तुम्हांला पडताळा येईल. ही खरी आहे की नाही ही शक्ती, कशी वाहते. ती दुसऱ्यामध्ये तुम्ही जागृत करू शकता. ती आल्यावरती टाळ्यावरती कशी येते, लहान मुले सुद्धा सांगू शकतात. आता ह्या ठिकाणी ही कुंडलिनी थांबलेली आहे. इथे हे चक्र धरलेलं आहे. या चक्रावरती कोणची देवता बसलेली आहे, ती कशी जागृत करायची त्याचेसुद्धा मंत्र आहेत.