Sarvajanik Karyakram Date : 22nd February 1984 Place Rahuri
ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK राहरी कारखान्याचे सन्माननीय अध्यक्ष श्री सर्जेराव पाटील, तसेच मित्र संघ संस्थेचे संचालक लोक, आपण इथे जमलेले सर्व राहुरीकर आणि मागासलेले लोक, म्हणजे तसं म्हणायला मला बरं नाही वाटत. कारण सगळी माझीच मुलं आहेत. सगळयांना माझा नमस्कार ! दादासाहेबांची एकदा अचानक भेट झाली आणि मी तेव्हाच ओळखलं , की ह्या मनुष्याला लोकांबद्दल खरोखर कळवळा आहे. ज्याच्या हृदयामध्ये कळवळा नाही, त्यांनी समाज नेते होऊ नये. ज्यांनी समाज कार्य केलं नाही त्यांनी राजकारणात येऊ नये. ज्यांनी समाजकार्य केलं आहे , ते जर राजकारणात आले तर त्यांना कळवळा राहील लोकांसाठी. पण बहुतेक लोक समाजकार्य एवढ्यासाठी करतात की आपण राजकारणात येऊन पैसे कमवू. ते मला सगळे माहिती आहे. मी लहानपणापासून आपल्या देशाची स्थिती पाहिली आहे. तुम्हा सगळ्यांमध्ये माझे वय कदाचित जास्त असेल. माझे वडीलसुद्धा फार धर्मनिष्ठ, अत्यंत उच्च प्रतीचे समाजकर्ते, देशकर्ते, राष्ट्रकर्ते आणि परत डॉ.आंबेडकरांच्या बरोबर अत्यंत मैत्री, अत्यंत मैत्री! जिव्हाळ्याची मैत्री होती. आमच्या घरी येणं-जाणं. सगळे काही. मी ह्यांना लहानपणापासून पाहिलेलं आहे. मी त्यांना काका म्हणत असे. तेव्हा अत्यंत जवळच नातं त्यांच्याबरोबर राहिलेले आहे. आणि अत्यंत तेजस्वी, उदार असे ते होते. माझे वडील गांधीवादी होते आणि हे थोडेसे गांधीजींच्या विरोधात होते. तेव्हा त्यांचा वादही चालत असे. संघर्षाची जरी गोष्ट म्हटली, तरी आपापसात अत्यंत मैत्री होती. फार मैत्री! माझे वडील जेलमध्ये गेले की यायचे आमच्या घरी, विचारायला, कसं काय चाललं आहे ? ठीक आहे की नाही? अशा सर्व मोठ्यामोठया लोकांच्या बरोबर माझं लहानपण गेलेले आहे. मी गांधी आश्रमातही वाढले आणि त्यांच्या संघर्षातूनच मी एक निष्कर्ष काढला. ज्योतिबा फुले झाले किंवा इतर जे काही समाजकर्ते झाले, आगरकर झाले, टिळक झाले, ह्या सर्वांच्या संघर्षामध्ये जी चीड होती, ती गोष्ट खरी आहे. जातीयता ही आपल्या देशामधील सर्वात भयंकर कीड आहे. म्हणजे कॅन्सरचा रोग आहे तो. आपण म्हणू ह्याला की ह्याच्यापेक्षा कोड आलेलं बरं ! पण ही जातीयतेची कीड आपण काढली पाहिजे आणि ही जातीयता यायलासुद्धा कारण पोटभरू लोकांचं आहे. आता आपण विचार करा, की जातीयता आली की तुम्ही जन्मापासूनच तुम्ही काय महार झाले, की जन्मापासूनच तुम्ही हे झाले. हे कसं शक्य आहे ? जर तुम्ही असा विचार करा, की ज्यांनी गीता लिहिली, कोणी लिहिली? व्यासांनी लिहिली गीता. माझा विचार हा आहे की ज्यांनी जात बनवली त्यांना मी विचारते. व्यास कोण होते ? एका कोळिणीचा पुत्र. ज्याला वडील नाहीत. अनाथ, ते व्यास! त्यांनी गीता लिहिली. ती वाचून तुम्ही जातीयतावाद कसा वाढवता! काय? ‘जाती’ हा शब्द जो निघाला, हा नंतर लोकांनी स्वत:चे वर्चस्व स्थापन करण्यासाठी कधीतरी केला. आपल्या देशामध्ये अशात-्हेची जात नव्हती. कर्मानुसार जात होती. चार जाती मानल्या जात असत. पहिली जात, जो ब्रह्माला शोधतो तो ब्राह्मण. 2
Original Transcript : Marathi वाल्मिकी कोण होता? परत एक कोळी. आज त्याचं रामायण डोक्यावर घेऊन बसतात आणि जातीयता करता, म्हणजे मला समजत नाही. याचा मेळ कसा बसवायचा ते सांगा तुम्ही? तर हे काहीतरी स्वत:चे वर्चस्व करण्यासाठी. लोकांनी जन्मापासून जात काढली, पण कर्माप्रमाणे जात होती पहिल्यांदा. परमेश्वराने ज्या जाती घातल्या, त्या आतल्या होत्या, बाहेरच्या नाही. आता समजा एक झाडाची जात आहे. आंब्याची जात आहे, त्याला आंबा आला पाहिजे. जो मनुष्य ब्रह्मतत्त्वाला जाणून घेतो, ब्रह्मतत्त्वात लीन होतो, तोच ब्राह्मण आहे. असे किती ब्राह्मण असतील, ते माझ्यासमोर या! परवा मी असा प्रश्न केला, येऊन माझ्यासमोर असे असे करायला लागले. म्हटलं, ‘हे काय होतं हो तुम्हाला? मोठे ब्राह्मण बनता. हे असं असं कशाला ? तुम्ही ब्रह्माला जाणलंय नां !’ ‘माताजी, तुम्ही शक्ती, म्हणून आम्ही हालतोय. हे शेजारचे हलतात.’ म्हटलं , जाऊन विचारा कोण आहेत ते ? त्यांनी जाऊन विचारपूस केली. कळलं की ते ठाण्याहून, पागलखान्यातून ठीक होऊन आले आहेत. म्हटलं, तुम्ही आणि ते एकच. काय आहे तुमच्यामध्ये जास्त? म्हणून स्वत:ला काहीतरी शिष्ट समजून जर कोणी म्हणेल, की मी ब्रह्मतत्त्वाला प्राप्त झालो आणि मी ब्राह्मण आहे, तर अशा सर्टिफिकेटने, सेल्फ सर्टिफिकेटने काही होणार नाही. असे सर्व धर्मामध्ये झाले आणि होतात. आणि हे आता सांगायचं म्हणजे, की शेड्यूल कास्टमध्ये आमच्या ओळखीचे एक गृहस्थ होते. ते चांगले जातीचे हे होते, म्हणजे मराठा समजा, राजपूत. पण ते स्वत:ला शेड्यूल कास्ट म्हणून आले. मी म्हटलं, असं कसं, तुम्ही शेड्यूल कास्ट असे कसे झाले ? म्हणे आता आयएएसमध्ये आहे तर शेड्यूल कास्ट झालो. म्हणजे आता दुसरी जात काढली आणखीन. तर हे असे संघर्ष चालू. ह्या गोष्टी काही ठीक होणार नाही. दुसरी गोष्ट, जात ही काही आपल्या देशात नव्हती. ज्यांनी ब्रह्मकार्य स्वीकारलं ते ब्राह्मण. ज्यांनी युद्धामध्ये परमेश्वराला शोधण्याचा प्रयत्न केला, ते क्षत्रिय. तर ज्यांनी पैशामध्ये, म्हणजे जे मारवाडी आहेत ते, ते वैश्य. कारण त्यांनी पैशामध्ये परमेश्वर शोधला आणि ज्यांनी असा विचार केला, की काहीही काम पडलं तरी हरकत नाही, पैसे कमवायचे त्यांनासुद्धा … आणि अशा लोकांना, उगीचच ज्या लोकांना आपल्याला जबरदस्ती करून काहीतरी वाईटपणाच्या त्यांना…. करून टाकलं, असं करून टाकलं. जे शेती करतात, ते सगळ्यात मोठे कार्य आहे. शेती उत्पादन करणं, शेतीचं कार्य करणं, सर्वात उच्च आहे. पण जो आयएएसचा मनुष्य असला, कलेक्टर, तो उच्च मानला जातो आपल्या देशात. तो तर सरकारी नोकरच. त्याला तरी माहिती आहे का? ती तर नोकराची जात आहे. त्याला आपण कलेक्टर म्हणून नमस्कार करतो. जो शेतीचा मनुष्य जो जमिनीत कष्ट उपसतो, तो खरं तर उच्च कार्याला लागलेला आहे. तेव्हा ही सगळी डोक्याचीच करामत आहे. लोकांच्या डोक्याचीच करामत आहे. काहीतरी डोकं चालवून, कसं लोकांच्या डोक्यामध्ये धोंडा घालायचा, देशातल्या लोकांना फार चांगलं येतं आणि ते अजून चालूच आहे. कुठेतरी चालूच असणार. आंबेडकरांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे. माझे वडीलसुद्धा कॉन्स्टिट्युअंट असेंब्लीमध्ये मेंबर होते. त्यांनी कॉन्स्टीट्युशन केलं. .ते आमच्या घरी येऊन बसत असत आणि वादविवाद व्हायचा. तेव्हा माझे वडील म्हणाले की, ‘असं हे आपल्या करू या, की जे लोक आपल्याला फार उच्च स्थितीचे म्हणतात,’ कारण माझे वडील साधे मनुष्य होते, ‘त्यांना आपण साधू करू. म्हणजे त्यांच्यातले लक्ष्मी तत्त्व जागृत होऊन ते सर्वांची मदत करतील. ‘ जसं आता सर्जेराव 3
Original Transcript : Marathi पाटीलांचे झालं. आंबेडकरांचं म्हणणं असं होतं, की तुम्ही काही ह्यांच्या गोष्टीत येऊ नका. हे लोक फार दुष्ट आहेत. लबाड आहेत. जे हे मोठेमोठे ब्राह्मण बनतात, ते काही आपल्याला देणार नाहीत. त्यांचा तर ….. केला पाहिजे. अस त्यांचं म्हणणं होतं. नंतर अल्लाद्दी कृष्णस्वामी अय्यर हे त्याचे चेअरमन होते. आपल्याला माहिती नाही जे कॉन्स्टिट्यूशन बनवलं गेलं त्यात सगळ्यात विद्वान मनुष्य म्हणजे अल्लाद्दी कृष्णस्वामी अय्यर , अगदी पक्का सन्याशी तुम्हाला सांगते. दोन धोतरावर राहणारा मनुष्य. त्याचं मी सगळं पाहिलेले आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. अशी माणसं मी पाहिलेली आहे. तुमचं नशीब नाही चांगलं म्हणून आता हे दुसरेच बघतात. पण आमचं नशीब चांगलं. आम्ही अत्यंत त्यागी माणसं पाहिलेली आहेत त्यावेळी. त्यांचं विशेष सांगितलं तर तुम्हाला वाटेल, माताजी कुठल्या गोष्टी करतात ? आणि त्यात हे जे अल्लादी होते, ते तर ब्राह्मणांच्या मागे हात धुऊन लागले होते. स्वत: ब्राह्मण. ह्यांच्या म्हणे सगळ्यांच्या शेंड्या कापू. तेव्हा त्यांच्यामध्ये जी जागृती होती, तेव्हा त्यांना जी वाटायची चीड, म्हणजे चीड सगळ्यांनाच वाटली, आगरकरांना वाटली नाही का, टिळकांना वाटली नाही का, गांधींना वाटली नाही, का, पण प्रत्येकाने आपल्या आपल्या तऱ्हेने गोष्टी मांडल्या. ‘माताजी, हे बुद्धांचं आहे.’ हे बरोबर आहे. बुद्धांनी पहिल्यांदा सांगितलं की, ‘बुद्धं शरणं गच्छामी !’ म्हणजे नुसतच बोलायचं नसत ते. आधी तुम्ही बुद्ध झाले का? बुद्ध म्हणजे काय? पाट्या लावून बुद्ध नाही होत. काय हो, नुसती आम्ही ख्रिश्चन म्हणून पाटी लावली, बुद्ध म्हणून पाटी लावली म्हणून काही आम्ही बुद्ध होत नाही. बुद्ध झालं पाहिजे. हे बुद्ध बसलेत तुमच्यासमोर. ज्यांनी ब्रह्माला जाणलं तो बुद्ध, ज्याला बोध झाला, ज्याला जाणीव झाली तो बुद्ध. ते कार्य आम्ही करतोय नां आता सहजयोगाचं! आधी बुद्ध होऊन घ्या. दूसरं त्यांनी सांगितलं ‘धम्मं शरणं गच्छामी’. म्हणजे धर्म जागृत झाला पाहिजे. सांगितलं की दारू पिऊ नका, की हमखास पिणार. ते मी बघतेय. लहानपणीसुद्धा आजीबाई होते मी. तेव्हापासून बघतेय. जे म्हटलं नाही करायचं, तेच करायचं. ही मनुष्याची प्रवृत्ती आहे. बंडखोरी. तेव्हा त्याच्यात जर धर्म जागृत केला, आपोआप सगळ सुटतं. म्हणून धर्म जागृत करायचा. ‘धम्मं शरणं गच्छामी’. पण सगळ्यात शेवटचं, ‘संघं शरणं गच्छामी’ जे सांगितलेले आहे बुद्धाचे, ते समजून घेतले पाहिजे. बुद्ध झाल्याशिवाय तुम्ही संघात उतरू शकत नाही. संघ म्हणजे काय ? ज्याला आपण सामूहिक चेतना म्हणतो. ह्या सबंध शरीराच्या अंगप्रत्यंगामध्ये हे बोट किंवा हे बोट वेगळं आहे का? एका संघात बांधलेले आहे. तसेच ह्या विराट पुरुषामध्ये आपण सगळे एक अंगप्रत्यंग आहोत. त्याच्यात फक्त जागृत व्हावं लागतं. जर तुम्ही जागृत झाला तर तुम्ही संघात आले मग काय? मग कोणती जात नी कोणती पात! तुमच्या हाताला आणि बोटाला काय वेगळी जात आहे? तुमच्या नाकाला वेगळी जात आहे का? जर ह्या बोटाची आम्ही मदत केली तर काय आम्ही कोणाची सेवा केली? तर ते आतून झालं पाहिजे. आपण झाडावरतीच भांडत बसलोय अस मला वाटायचं लहानपणापासून. ही सगळी मंडळी झाडावर बसून आपापसात भांडत आहेत, बोलत आहेत, विचार करत आहेत. आता ह्यांनी म्हटलं की काही विशेष होऊ शकलं नाही. तर त्याला कारण असं की मुळात जा नां! प्रत्येक गोष्टीचं तत्त्व धरलं पाहिजे आणि त्या तत्त्वामध्ये मुख्य तत्त्व हे आहे, की तुमचा आत्मा हा सर्व विश्वात व्यापलेला आहे. ते विश्वव्यापी स्वरूप तुम्ही मिळवून घ्या. हा आमचा सरळ सहजयोग आहे. मग म्हणतील कोण ब्राह्मण आणि कोण क्षुद्र! सगळे योगीजन झाल्यावरती, परमेश्वराच्या साम्राज्यात उतरल्यावर जातीयता कुठून राहणार? ही 4
Original Transcript : Marathi सगळी माणसांनी पसरवलेली घाण आहे. अहो, माणूस इथे तर तिथे घाण होणारच. तुम्ही आत्ता जाऊन बघा. एखाद्या जंगलात, एकसुद्धा घाण दिसणार नाही. ते जसं गाव यायला लागलं, बाहेरूनच सुगंध येतो, की माणसं आहेत. जनावरं राहतात, साप रहातात, सर्व तऱ्हेचे राहतात लोक, पण एवढी घाण दिसत नाही. ते गावात आलं की कळतं, की गाव लागलं! ती माणसाला सवय आहे. त्याला डोकं आहे असं जबरदस्त, की कसंतरी, जे काही चांगलं आहे, त्याचं काहीतरी अनिष्ट करून टाकायचं. बुद्धांचं तरी काय भलं केलेले आहे का? मी बघते बुद्धमार्गी लोकांना तर मला आश्चर्य वाटतं की बापरे, बुद्धाला काय करू ? हे जैनांचे महावीर, त्यांचे काय हाल करून ठेवलेत! ते समकालीन एकच गोष्ट करत होते. त्यांचे हाल करून ठेवले. ख्रिस्ताचे हाल करून ठेवले. आपल्या सर्व साधु-संतांनी जे काही शिकवलं, त्यांचे ही हाल करून ठेवले. आता जागृत तुम्हीच व्हा. सगळ्यांना बुद्ध करायचं कार्य मी काढलेले आहे. खरा बुद्ध धर्म हा सहजयोग आहे. कारण ह्याच्यात तुम्ही स्वत: बुद्ध होता. तुम्हाला बोध होतो. तुमच्या बोटांमधून बोध होतो आणि तुम्ही जाणता, तुमचं काय चुकलेले आहे, दुसऱ्यांचे काय चुकलेले आहे, कसं स्वत:ला नीट करून घ्यायचं. आणि एकदा हा जर तुम्ही बुद्ध धर्म घेतला जो आतला, तुमचा सर्वांचा आहे. सगळ्यांना कुंडलिनी आहे. कुंडलिनीला जातपात काही नाही. आहे का? तुमच्या आत्म्याला काही जातपात आहे का? फक्त कुंडलिनी व आत्म्याचा संबंध जोडून देणे. हे एक कार्य आहे. ते जर झालं की लक्ष्मीचं तत्त्वसुद्धा जागृत होतं. आता मी म्हणेन मागासलेल्या लोकांना त्रास काय? त्यांच्या त्रासाचंसुद्धा एक तत्त्व आहे, ते ही जाणून घ्या. मी सांगते, आई आहे म्हणून. सांगितलेच पाहिजे. म्हणजे भूत आणि हे सगळे, प्रेतविद्या, स्मरशानविद्या, हे धंदे करून आपण आपला सर्वनाश करून घेतलेला आहे, मागासलेल्या जातीने. ते सर्व सोडलं पाहिजे तुम्ही. चेटक, हे, ते फार करतात. परवा मला एक भेटले होते मागासलेले. त्यांनी मला प्रश्न टाकला, माताजी, मग परमेश्वर सगळीकडे एकसारखा आहे, तर आम्ही अजून एवढे मागासलेले का? अहो, आधी परमेश्वराच्या साम्राज्यात जा. तुम्ही तर इंदिराबाईंच्या साम्राज्यात बसलेत. हा प्रश्न त्यांना जाऊन विचारा. पण जर मला विचाराल, तर आधी परमेश्वराच्या साम्राज्यात जाऊन मग पहा, कशी दरिद्रता राहते ते. कारण हे एकदा संकट सुटलं, हा चेटुकाचा जो प्रकार चालतो आणि हे जे धंदे चालतात आणि त्यात आणखीन ब्राह्मणांची भर. म्हणजे हे सगळे उपटसुंभ जाऊन तिकडे, ‘तुमचं हे आम्ही भलं करतो. चार आंगठ्या आम्हाला द्या. दोन रुपये आम्हाला द्या.’ हे असेच तिकडे ते पण आहेत. हे सगळं जर तुम्ही सोडलं, तर गरिबी अशी पळून जाणार! कारण हे जिथे असेल तिकडे लक्ष्मी अशी पळते. बरं परत सांगते पुढची गोष्ट! कारण मी सर्व देशात फिरलेली पण आहे पुष्कळ. जातीयता निघून गेली , तरी समता येणार नाही. हे लक्षात ठेवा. समता शब्द वेगळा आहे. आता काय आहे, की ज्या ठिकाणी जातीयता नाही, परदेशामध्ये, तिथे काय लोक सुखी आहेत ? तिथे काय दुर्दशा आहे ते मला विचारा तुम्ही! इंग्लंडलाच नाही तर त्या नुसत्या लंडन शहरात, प्रत्येक आठवड्यामध्ये दोन मूलं आई-वडील मारून टाकतात. आता बोला! जातीयता नाही तिथे. अहो, जेव्हा दसर्यांना नाही मारू शकत बनून तर आता आपल्याच मुलांना मारायला सुरुवात केली. म्हणजे काहीतरी बिघडलेले आहे नां डोके! काहीतरी बिघडलेले आहे. कोणाला विश्वास नाही वाटायचा, पण हे तिथे स्टॅटिस्टिकमध्ये आहे, की त्या लंडन 5
Original Transcript : Marathi शहरामध्ये दोन मुलं आई-वडील मारून टाकतात. मी आपल्या डोळ्याने बघितलं. एवढी एवढी लहान लहान जन्मलेली मुलं, दुसर्या खोलीत झोपवायची. कुत्री-मांजरी आपल्या खोलीत झोपवायची. पाहिलं का तुम्ही कुठे? ती मुलं तिकडे मरून गेली तरी चालतील. तुमचा विश्वास नाही बसणार, इतके दुष्ट स्वभावाचे लोक आहेत! उठल्या सुटल्या बंदुकीने गोळ्या झाड. अमेरिकेत हे सारखं चालतं. चोऱ्यामाऱ्या तर इतक्या की तुम्हाला आश्चर्य वाटेल आता आम्ही इथे रात्रीचे फिरतो. कोणी अडवत नाही. काही नाही. तिथे तर अशी रात्रीची फिरण्याची सोयच नाही. कुठेच. दिवसाढवळ्यासुद्धा तुम्ही जर हातामध्ये पर्स घेऊन गेलात, तर ओढून घेणार. लंडनलासुद्धा. अमेरिकेला तर काय विचारायलाच नको. मी गेले तर साहेबांनी सांगितलं की सगळे दागिने काढून या. म्हटलं, ‘हे बघा, मला ते जमायचं नाही. कारण हे देवीचं काम आहे आणि हे सगळे दागिने म्हणजे त्या देवीचे आहेत. मला काही काढता येत नाही. चोरी कोण करतं ते मी बघते. पण तुम्ही असं म्हणू नका. मी ते काही काढू शकत नाही. हे देवीचे आहेत. ते अलंकार मला घालावे लागणार. जोपर्यंत ते काम आहे.’ तर अशी तिथे स्थिती आहे. तुम्हाला माहिती नाही. तिथे लोकांना काय काय त्रास आहेत ! रात्रभर झोपू शकत नाही. वेडावलेत. ६५% लोक वेडे आहेत. आता बोला. तिथे काही जातीयता नाही. मग काय ? माणसाचा स्वभाव असा आहे, की जर त्याला, एखाद्या ग्रुपला किंवा एखाद्या समाजाला दाबायची सोय ठेवली नाही, तर तो घरातच दाबादाबी सुरू करतो. कुठेतरी करणारच. तो स्वभाव आहे. त्याला इलाज काय? त्याला इलाज असा आहे, की कुंडलिनीचं जागरण केलं तर आज्ञा चक्रावरती तुमचा अहंकारच ओढून घेते कुंडलिनी. सट्ाक, तर हे जे कार्य आहे, ते ह्या वसतीगृहात तुम्ही ह्या मुलांना द्या. ह्या लहान मुलांना पार करा. जसं पाटील साहेबांनी आपल्या शाळेमध्ये मुलांना पार करून घेतलं. तसं तुम्ही पार करून घ्या. हा खरा आशीर्वाद आहे. आता आपण जे म्हटलं, की पैशाचं सोंग घेता येत नाही. कबूल आहे. पण पैशाचं चीज आपण करू शकतो. ते चीज करायला शिका. एक साधारण गोष्ट आपल्याला सांगते, की आमच्या सहजयोगामध्ये एक खेड्यातला मनुष्य, आता त्याला मागासलेला कसं म्हणायचं, माझा मुलगाच आहे तो. तुम्ही म्हणा मागासलेले त्यांच्या जाती बनलेल्या असतात, त्याला मी काय करू ? अशा जातीचा एक मनुष्य आमच्याकडे येत असे. पाटील आहेत ते. फार सभ्य मनुष्य आणि फार गरीब. बरं, सहजयोगात दानधर्माची प्रथा नाही. आम्ही प्रथा नाही ठेवलेली. एका अर्थी दान होतच आहे ते. तर तो मनुष्य आमच्याकडे आला, तर मी म्हटलं, ‘काय करता पाटील. रोजचा पण एक फुलाचा हार घेऊन येता. कसतरी हो. मी कोणाला तरी म्हटलं, ‘कमीत कमी ह्यांचे हाराचे तरी पैसे द्या.’ मला जरासे ते कसेसेच वाटले, की आता हाराचं कशाला माझ्यासाठी आणखीन ! इथे एवढे हार येतात आणि हे कशाला आपले पैसे घालतात. तर तो म्हणाला, ‘माताजी, माझा प्रश्न सुटला.’ ‘कसा?’ ‘नाही, म्हणजे आता पैशाचा मला काही प्रश्न नाही.’ ‘असं कां? काय झालं काय?’ ‘नाही आमची पडीक जमीन होती नां बाहेर. मी तिथे ध्यान करतो बसून सकाळचं आणि संध्याकाळी थोडीशी शतपावली करतो तिथे.’ ‘तर काय झालं काय ?’ ‘अहो, त्या जमिनीत काय गुण आला माहीत नाही. एक सिंधी माझ्याकडे आला, असं म्हणाला, ‘ह्या जमिनीची थोडीशीही माती घेतली,’ म्हणजे पुण्यवान जमीन झाली नां! तर ‘आमच्या विटा दगडासारख्या निघाल्या.’ तर त्याने तराजूने तोलून घेतले. हे लक्ष्मी तत्त्व जागृत झालं. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, की त्या माणसाचा मुलगा जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये, म्हणजे जिथे फार श्रीमंतांची, माझी मुलगी तिथेच शिकली, हजारो लोक 6
Original Transcript : Marathi तिथे उभे राहतात, पण फर्स्ट क्लास फस्स्ट आल्यामुळे स्कॉलरशिप मिळून आता तिथे शिकतो आहे. हे लक्ष्मी तत्त्व आधी जागृत करून घेतलं म्हणून. मला कबूल आहे, तुम्ही शाळेत घाला. शिक्षण द्या, पण त्यांना एक तर पार केलं पाहिजे. बुद्ध केलं पाहिजे. दुसरं म्हणजे तुमच्या खेडेगावातून टोटके आणि हे करत फिरतात ह्यांना मात्र तुम्ही काढून टाकलं पाहिजे. हे परमेश्वराच्या विरोधात आहेत. पैसे बनवण्यासाठी हे जे लोक कामं करत असतात, प्रेतविद्या, स्मशान विद्या, भानामती वरगैरे, ह्या सगळ्यांचा तुम्ही नायनाट करा म्हणजे लक्ष्मी तत्व जागृत होईल. आणि त्याच्यातले काही आपल्या राजकारणी लोकांच्याही डोक्यात घुसलेली आहेत भुतं. हे भुताटलेले लोक आहेत. म्हणून असं होतंय. हे काही नॉर्मल लोक मला वाटतच नाही त्यांच्या बोलण्यावरून. ह्यांना आधी नॉर्मलाइज करायला ह्यांना आधी सहजयोगात आणुयात. सगळेजण योगीजन होऊन घ्या म्हणजे बरं. आता सांगायचं म्हणजे असं आपल्या समाजाचं कल्याण, देशाचं कल्याण, सर्व विश्वाचं कल्याण करायचं असलं तर आपल्यामध्ये समग्रता यायला पाहिजे. समग्र, म्हणजे सगळ्यांच्या अग्राला एकाच दोरीने बांधून घ्यायचंय. ती दोरी म्हणजे विश्वाची कुंडलिनी आहे. त्या दोरीत एकदा तुम्ही बांधले गेले, म्हणजे कसली जात नि कसली पात. सगळे त्या प्रभू परमेश्वराच्या अंगातले अंगप्रत्यंग झाल्यावर कसली जात नी कसली पात! हे आमचं कार्य आहे. तेव्हा बाहेरच्या झाडावरच्या पानांना जोडण्यात काही अर्थ नाही. मुळात घुसलं पाहिजे. म्हणून सर्वात मुख्य सांगायचं म्हणजे असं, की इथे जे आपण वसतीगृह कराल , त्यात कोणी मागासलेला म्हणून म्हणायचं नाही. कोणी काही म्हणायचं नाही. याला कलंक कसला आला! हे नसते जबरदस्तीचे धंदे आहेत. आपल्या देशात ह्या प्रमाणात आहेत, तिथे दुसर्या प्रमाणात आहेत. परत आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे पैसे आले, अॅफ्ल्यूअन्स आलं, म्हणजे आपण फार बरे होऊ. तसं ही नाही आहे हो! ह्या लोकांच्या जवळ एवढे पैसे आहेत मी परवाच सांगितलं, की स्वित्झर्लंड, नॉर्वे, स्वीडन तीन देशांमध्ये सगळ्यात जास्त पैसा आहे आणि तिथे सगळ्यात जास्त लोक आत्महत्या करतात. आता बोला ! त्यांना डोहाळे लागले आत्महत्येचे. काय म्हणावं! तिथले तरुण तरुण मुलं आली, मुली आल्या. त्यांच्या हातामध्ये मला अशी जाणीव झाली, प्रेताची स्थिती आहे. म्हटलं करता काय तरुण लोक? तोंडं अशी सुकलेली. मेल्यासारखी. म्हटलं, झालं काय तुम्हाला? ‘नाही’ म्हणे, ‘आम्ही बसल्या बसल्या असा विचार करतो, की आत्महत्या कशी करायची?’ खायला, प्यायला, द्यायला कशाची ददात नाही. त्याची ददात म्हणजे आत्महत्या करणे. तर म्हटलं झालं काय असं? असं काय करता ? तुम्हाला काही खायला नाही, की प्यायला नाही. तुमच्याकडे काही मोटारी नाही, की गाड्या नाहीत की शिक्षण नाही. सगळं काही आहे. मग, नाही म्हणे आम्हाला आनंद नाही मिळत. कारण आम्हाला आनंद नाही मिळाला कोणत्याच गोष्टीत म्हणून आता आम्ही आनंदाकडे वळतो. बुद्धाचेच उदाहरण आहे नां! सगळे असूनसुद्धा तो कशाला गेला परमेश्वराच्या शोधात. तसे हे परमेश्वराच्या शोधात आत्महत्या करीत आहेत. तेव्हा तुम्ही कशाला तितकं लांब जाऊन, आत्महत्या करून मग परमेश्वर मिळवता? आत्ताच मिळवून घ्या नां! इतका लांबचा रस्ता कशाला ? आधी ते लोक ड्रग्ज घ्यायचे, मग भुतासारखे केस काढून जसे फिरले, आरडाओरडा केला, सगळं केलं त्यांनी. संपलं त्यांचं ते. आता आलेत 7
Original Transcript : Marathi सहजयोगात आणि मी म्हटलं, की एवढं लांबलचक फिरायची काय गरज आहे? इथेच हृदयातच बसलेले आहेत. तुमच्या आत्म्याचं स्थान तुमच्या हृदयात आहे. ते आपण घ्यावं आणि त्याच्या शक्तीपुढे बघा! काही दरिद्रता आहे? काहीच नाही. तशीच नष्ट होऊन जाणार. कृष्णाने सांगितलं आहे नां, योगक्षेम वहाम्यहम् ! म्हटलेले आहे नां, योगक्षेम वहाम्यहम् ! योग झाल्यावर तुमचा क्षेम बघणार, पण आधी योग तर घ्या. तोपर्यंत त्याचं कनेक्शनच लावलेले नाही तर त्याचा उपयोग काय? आधी योग घ्या, असं मी सगळ्यांना सांगते. मग पुढचं बघू. पण योग घेतला, अंकुर फुटला की बसले एकीकडे जाऊन. थोडीशी मेहनत एक महिन्याची आणखीन करा, म्हणजे बघा, तुमचं वसतीगृह बघा. ह्या सबंध राहरीला एक नवीन रूप येणार आहे. आमची हीच मेहनत आहे. आमच्या आई – वडिलांचं स्थान आहे. आणि त्यांना, जरी श्रीमंत होते फार, तरी सगळे काही घरात असूनसुद्धा, सगळा त्याग करूनसुद्धा एक समाधान त्यांना मिळालं नाही, की आमच्या देशाचं काही भलं झालं नाही. एवढी मेहनत केली, जेलमध्ये गेलो. आम्ही आमच्या मुलांचा, सगळ्याचा त्याग केला. सगळं काही केलं पण तरीसुद्धा आमच्या देशाचं काही भलं झालं नाही. पण आमचे वडील जे होते ते फार साधु-संन्याशी होते. त्यांनी मला सांगितलं की, ‘बाई, तू ज्या कार्यासाठी आली आहेस, ते कार्य फार मोठं आहे. हा महायोग आहे. तर तू ते शोधून काढ की सर्व जण सामावतील. कशा रीतीने, योग्य कारय? तू जर ते शोधून काढलंस, तर माझ्या जीवनाचं सार्थक झालं . ते तू शोधून काढ.’ त्यांच्या वेळेपर्यंत मी करू शकले नव्हते , पण आई जायच्या आधी तिने विचारलं, ‘झालं का ते? म्हटलं, ‘हो. हो झालं . शोधून काढलं.’ तिने आनंदाने प्राण सोडले. तेव्हा जे आम्ही मोठे मोठे लोक पूर्वी पाहिले होते, म्हणजे पुष्कळ मोठे लोक झाले. त्यांच्यापेक्षा तुम्ही मोठे होऊ शकणार. फक्त आपल्या आत्म्याला जागृत करून घ्या. ते अगदी सोप काम आहे. त्याला पैसे लागत नाही. बिल्डिंगा लागत नाही. जिथे असाल तिथे होईल. हे आधी घेऊन घ्या. सरळ आहे नां गोष्ट. हे एकदा मिळवून घ्या, म्हणजे बघा, तुमचं कार्य कसं सुरळीत आणि व्यवस्थित चालतं. हाच एक दोष आपल्यामध्ये आहे, की अजून आपलं परमेश्वराच्या साम्राज्यात पदार्पण झालेलं नाही. त्याचा आशीर्वाद द्यायचा तर कसा द्यायचा. ज्या झाडाला अजून पाणी लागलेलं नाही, ते सुकूनच जाणार. म्हणून कनेक्शन हे करून घेतलं पाहिजे. संबंध हा जोडून घ्यावा. हा आमच्या सहजयोगाचा सरळधोपट मार्ग आहे. बाकी ह्या मुलांनासुद्धा फार उदारता आहे. ह्या बाहेरून आलेल्या लोकांना फार उदारता आहे. आधीच आम्ही आत्ता गेलो होतो (अस्पष्ट) च्या तिथे. तिथे काहीतरी व्यवस्था झाली मुलांची, शाळेची वरगैरे. तर मला म्हणतात, माताजी, आम्ही एकेका मुलाला आमचा वारसदार करू. ते करतील म्हणा, पण त्याने काही हे काही मोठं धोरण नाही माझं. होईल. म्हणजे पैसे मिळतील, शिकले, अहो, शिकलेले कितीतरी गाढव मी पाहिलेत. शिकून काही शहाणपण येत नाही माणसाला! अगदी महागाढव होतात. आणि हे राजकारणी काही शिकलेलेल नाहीत नां ! त्यांच्यात हृदयच नाहीये. हृदयच नाहीये बघायला, की अहो, हा आपला शेजारचा मनुष्य मरतोय आणि तुम्ही काय गमजा करता आणि पैसे काय खाता! ते हृदय जागृत व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून आमचा सहजयोगाचा कार्यक्रम चाललेला आहे. आम्ही जे काही होईल ते सबंध, सगळ्यांच्यासाठी करतोय आणि ते करणार आहोत. जे काही आपल्याला त्रास असतील, फक्त सांगायचा अवकाश. पुष्कळांचे इलाज होतात. नुसतं ऐकूनसुद्धा होऊ शकतं. परमेश्वराच्या साम्राज्यात मात्र आपण या, नाहीतर आमचा हात नाही चालत. आमचा हात परमेश्वराच्या साम्राज्यात आल्यावर
Original Transcript : Marathi चालेल. तो आशीर्वाद तुम्ही घ्या. परमेश्वराच्या साम्राज्यात येऊन बसा आसनावर आणि मिळवा स्वत:चं. ‘तुज आहे तुजपाशी’, ते घ्या. मग कोण रंजले आणि कोण गांजले. अहो, दिवा लावल्यावरती दिवा प्रकाश देतोच स्वत:. दिवा लावण्याचीच वेळ आहे. तोपर्यंत आपण मागतो की तेल घाला ह्याला, दिवा ठीक करा, त्याची वात ठीक करा. आणखीन प्रकाश द्या. आता काही नको करायला. तुमचा दिवा मी ठीक ही करते आणि तो तेवून ही घेते. तो तुम्ही तेवत ठेवायचा, बस्! तुम्हीच देणारे होणार. एवढे मात्र करून घ्या. जे खरं आहे तत्त्व ते एकदा मिळवा. हे फार जरुरी आहे. बाकी सगळे मिळवलेले तुम्ही पाहिले नां ! काय त्यांनी दिवे लावले ते ही कळलेले आहे. तेव्हा तुम्हाला खरोखर जर दिवे लावायचे आहेत, तर जे अस्सल आहे ते मिळवलं पाहिजे. नकलावरती जाऊ नका. अशी एक अत्यंत प्रांजळ विनंती मी तुम्हाला करते! मी आई आहे. जर काही मी तुम्हाला बोलले असेन, आईचं वाईट नाही वाटून घेतलं पाहिजे. ती तुमच्या हितासाठी झटते आहे. तुमच्या हितापलीकडे मला काहीही नको. जे काही आहे माझ्यामध्ये ते सगळेच तुम्हाला द्यायला मी आले आहे. ते घेऊन टाका. म्हणजे मी मोकळी होईन. सर्वांनी मला इथे बोलवलं, भूमीपूजन केलं आम्हा सर्वांच्यातर्फे, तुम्ही जे मागाल ते आम्ही द्यायला तयार आहोत. मला ते समजत नाही विशेष तेव्हा ते आपण मला कळवावं. म्हणजे आमचं काय आहे, की जागतिक एक ऑर्गनायझेशन असल्यामुळे त्यांच्या कारय व्यवस्था आहे वगैरे, त्यांच्याद्वारे सगळें काही होतं. मला पैशाचं एक अक्षर कळत नाही. तेव्हा त्यांचं काय असेल ते तुम्ही लिहून कळवा, काय तुमच्या गरजा असतील ते. मग तिथून काय पाठवायचं, करायचं ते करू. पण त्याचं काही महत्त्व मला नाहीये. मला महत्त्वाचं आहे, की तुमच्यातले किती लोक जागृत होतात नि किती सहजयोगी होतात? तर आता मी आलेली आहे. तर आशीर्वादस्वरूप सर्वांनी असा हात करून बसायचं. आरामात. आणि विचार जरा बंद करा. आता तुम्ही असाल राजकारणी. तुम्ही असाल कुठले काही. पण सध्या तुम्ही आईची मुलं म्हणून बसायचं. आणि हे घेऊन टाका तुमचं तुमच्याजवळ जे आहे. तुमच्या आत्म्याचं तुम्ही घ्या. असे हात करून बसा. त्याला जातपात लागत नाही, काही लागत नाही. तुमच्यामध्येच आत्म्याचं स्थान आहे. ते तुम्ही मिळवून घ्या. काय सुमंतराव! नाव तुमचं सुमंत आहे नां ? सुमंत कोण होते माहिती आहे नां तुम्हाला? माहिती आहे का ? रामाचे सचिव होते. फार मोठं नाव घेतलंय तुम्ही. काय? आईने काहीतरी विचार करूनच नाव ठेवलं असणार. तेव्हा तसं काहीतरी करायला पाहिजे. असे हात करून बसा, अहो, त्या रामाने भिल्लीणीची उष्टी बोरं खाल्ली. मी तर म्हणते, भिल्लीणीची उष्टी बोरं काय पण तिच्या हातचं जेवणही खाणार नाहीत हे गाढव ! आहे नां गोष्ट खरी! मी आहे म्हणून म्हणते ह्यांना! त्यांनी भिल्लीणीची बोरं खाऊन दाखवली तरी ह्यांच्या डोक्यात प्रकाश नाही पडला, तो कसा प्रकाश पडणार! आत्म्याचा पाहिजे. त्याच्याशिवाय इलाज नाही. काहीही करून दाखवलं हो. विद्राच्या घरी जाऊन कृष्णाने अन्न खाल्लेले आहे. पण तरीसुद्धा लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला नाही. एवढा मोठा गीतेचा सबंध ग्रंथसुद्धा त्यांनी कोणाच्या हातून लिहन घेतला? तर त्यांना आणखीन कोणी मिळाले नव्हते. शोधून त्यांनी व्यास काढला. कोळीणीचा. रामायण 9
Original Transcript : Marathi वाल्मिकीकडून लिहून काढलं परमेश्वराने. परमेश्वराचे चुकलेले नाही. तो वारंवार धडे देतोय तुम्हाला. पण मनुष्याच्या जातीला अक्कल नाही येणार. किती धक्के बसले तरी तसेच. म्हणून आता पार होऊन घ्या. तुम्हीच होऊन घ्या आता बुद्ध, म्हणजे झालं! मग मला काही बोलायला नको. कळलं कां? आता असे हात ठेवा. साधे असे हात करून बसायचं. आता डोक्यावरती बघा तुमच्या गार येतंय का? ह्या हाताने बघा. डोक्यातून गार निघालं पाहिजे. टोप्या काढून बसा. आईकडे कोणी टोप्या घालून बसत नाही. काढा टोप्या. टोप्या कशाला आईसमोर. आईकडे आपण कसे येतो बरं! बघा, वर येतंय का, डोक्यावर गारगार. गार आलं पाहिजे डोक्यातून. ज्या भूमीवर बसला आहात ती भूमी केवढी पुण्यभूमी आहे ते कळेल तुम्हाला! हं येतंय का? काय हो? आता उजवा हात करा. गरमी फार आहे. सगळ्याचीच गरमी चढते. मग आजार होतात. गरमी फार आहे डोक्यात. उजवा हात माझ्याकडे करून सगळ्यांना क्षमा करा आता. आधी सगळ्या राजकारण्यांना क्षमा करा. अज्ञानात करताहेत ते काम. आणि ज्यांनी जातीयता पसरवली त्यांनाही क्षमा करा. मूर्ख आहेत ते. कोणी गाढव आहेत, कोणी मूर्ख आहेत. काय करायचं? सगळ्यांना क्षमा करायची आपण समजूतदारपणे. आता बघा, येतंय का डोक्यावर? काय? बघा गार आलं पाहिजे. क्षमा करा क्षमा. डोळे मिटून क्षमा करायची. क्षमा करता येत नाही लोकांना आणि म्हणतात की, ‘माताजी, क्षमा कशी करायची ?’ पण अहो, तुम्ही क्षमा नाही केली तर स्वत:ला त्रास करून घेता. दुसऱ्यांना होत नाही. क्षमा करा. ‘मी क्षमा केली’ म्हणा. मनाने म्हणायचं, पूर्ण मनाने. बघा येतंय का? तुमच्याच डोक्यातून निघालं पाहिजे. बघा जरा बारीक. सूक्ष्म आहे ते. सूक्ष्म आहे. आपण जडात बसलोय. सूक्ष्म आहे. आलं कां? बघा, सूक्ष्म आहे. तुमचे स्वत:चं आहे. हे स्वत:चं आहे बघा. गार येतंय का? आता चोहीकडेसुद्धा गारवा वाटेल. आता हात असे वर करून बघा. आणि विचारा, ही ब्रह्मशक्ती आहे का ? ही परमेश्वराची शक्ती आहे का आई? असं विचारायचं मला. विचारा, ही परमेश्वरी शक्ती आहे का ? मनापासून विचारा. ह्याचं उत्तर मी देते. ही आहे. ही शक्ती आहे बघा. हातात येते आहे तुमच्या. हे चहकडे जे जिवंत कार्य परमेश्वर करतो, ते आपण बघत नाही. लागलं हाताला गार. आता बघा शांत वाटेल. आता ह्याच्यानंतर बघा प्रचिती येईल हळूहळू. काय. आता ‘बुद्धं शरणं गच्छामी’ म्हणायचं. नाहीतर मंत्राला काही अर्थ नाही. जागृत नाही. आता जितक्यांची नावं घेतली तितके साक्षात्कारी होते. सगळे साक्षात्कारी. पण त्यावेळेला ही गोष्ट करण्याची सोय नव्हती. येतंय का हातात. गार येतंय. काही आलं ! छान वाटतं, शांत ! तर आता मी सगळ्यांचा निरोप घेते. परमेश्वरी कृपेने सगळं तुमचं कार्य सुव्यवस्थित होईल . मुलांचे मला पत्ते पाठवा. फोटो पाठवा. ह्या लोकांची इच्छा आहे, की इथल्या मुलांना अँडॉप्ट (दत्तक) करायचं. त्यांची व्यवस्था करतील. प्रेम देतील त्यांना. अशा रीतीने हे लोक करतील. आपण मुलांचे पत्ते आणि फोटो पाठवून द्यावेत. त्यांनाही पार करावं. त्यांची प्रकृती बरी राहील. त्यांचे सर्व रीतीने ठीक होईल. आपण बोलवलंत त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. आणि सर्व सहजयोग्यांच्यातर्फे मी आपले आभार मानते. 10